अभियानाची कल्पना होती, पण बसवा राजूला वाचविण्यात अपयश, प्रवक्ता विकल्पची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:45 IST2025-05-28T12:45:06+5:302025-05-28T12:45:49+5:30
Gadchiroli : सुरक्षा कमी केल्याने घात

There was an idea for the campaign, but it failed to save Basava Raju, spokesperson Vikalp admits
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: पोलिस - नक्षल चकमकीत २८ नक्षल्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. यात जहाल नेता नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू (७०) याचाही समावेश होता. दरम्यान, माओवाद्यांचा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता 'विकल्प' याने पोलिसांच्या अभियानाची कल्पना होती, पण सुरक्षा देण्यात कमी पडलोत, त्यामुळे सर्वोच्च नेत्याला वाचविण्यात यश आले नाही, अशी कबुली दिली. २५ मी रोजी विकल्पने तीन पानांचे पत्रक जारी केले, यात हा खुलासा करण्यात आला आहे.
२१ मे रोजी छत्तीसगडच्या अबुझमाड जंगल परिसरातील गुंडेकोट भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गंगन्ना उर्फ बसवा राजू याच्यासह २८ नक्षली ठार झाले. यासंदर्भात माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता 'विकल्प' याने तपशीलवार खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, मागील ६ महिन्यांत छत्तीसगडमधील वेगवेगळ्या दलममधील अनेक नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यांनी बसवा राजू व अन्य वरिष्ठ नक्षल्यांबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जानेवारी व मार्च या दोन महिन्यात दोन मोठे अभियान राबविले. परंतु त्यावेळी बसवा राजूला ठार करण्यात पोलिसांना यश आले नाही. पुढील दीड महिन्यात बसवा राजूच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी असलेल्या ६ वरिष्ठ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी बसवा राजूच्या ठिकाणांची इत्यंभूत माहिती पोलिसांना दिली. पुढे हे सहाही जण स्वतः नक्षलविरोधी अभियानात सहभागी झाल्याने राजू यास ठार करणे सोपे झाले, असे माओवादी प्रवक्ता 'विकल्प' याने पत्रकात म्हटले आहे.
२१ मे रोजी झालेल्या घटनेच्या चार दिवसांपूर्वीच्या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख विकल्प याने पत्रकात केला आहे. घटनेच्या वेळी ३५ नक्षली होते. त्यापैकी २८ नक्षली ठार झाले, असे सांगून विकल्प याने माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवा राजू यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आम्ही असफल ठरलो, अशी कबुली दिली आहे.
म्हणून कमी केली होती सुरक्षा
बसवा राजू यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कवचातील कंपनी क्रमांक ७मध्ये जानेवारी महिन्यापर्यंत ६० नक्षली होते. परंतु प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांचा घेराव भेदून सुरक्षितरित्या निसटता यावे, यासाठी ही संख्या कमी करण्यात आली. बसवा राजूच्या सूचनेवरुनच 'शांतीवार्ता' साठी अनुकूल वातावरण तयार व्हावे म्हणून माओवाद्यांनी ४० दिवस एकही कारवाई केली नव्हती, असेही पत्रकात नमूद केले आहे.
सरकारवर टीकास्त्र
- प्रसार माध्यमांनी आवाज उठवला नाही, अशीही टीका 'विकल्प' ने मीडियावर केली आहे.
- विकसित भारत निर्माण करण्याच्या नावाखाली सरकार कार्पोरेट हिंदू राष्ट्र निर्माण करीत आहे, असा आरोपही विकल्पने केला आहे.