नगदी उत्पन्नाच्या आशेने मिरची लागवडीकडे वाढला कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:57 IST2024-10-26T15:56:47+5:302024-10-26T15:57:26+5:30
वैरागड परिसरातील शेती अनुकूल : २०० हेक्टरवर बहरणार पीक

There is an increased trend towards chilli cultivation in the hope of cash income
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : मिरची हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असल्याने या घटकाला सर्वत्र मागणी होत असते. मिरची नगदी पीक म्हणून ओळखले जाते. आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मिरची पिकाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षीपासून लाल व हिरव्या मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे मिरची पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. जळपास २०० हेक्टरवर मिरची पिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, मोहझरी, सुकाळा, मानापूर, कोसरी व इतर आठ-दहा गावात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ मालेवाडा येथे आहे. पण अलीकडे या भागात पीक पद्धतीत बदल करून मिरची ऐवजी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन जाते. मका पिकाचा पेरा वाढला असता तरी मिरची पिकाचे उत्पादन घटले नाही.
या भागात मिरची पिकाचे उत्पादन केवळ लाल मिरचीसाठी केले जाते. कारण बाजारात हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीला अधिक भाव असतो आणि हे नगदी पैशाचे पीक आहे. ज्या काळात आजच्या इतक्या सिंचन सुविधा नव्हत्या त्या काळात मोट, नाडा लावून मिरची पिकाला सिंचनाची सोय केली जात होती. नंतर ऑइल इंजिन आले आता तर विद्युत कृषी पंपाने सिंचनाची सोय झाल्याने सिंचन सुविधा सुलभ झाली व मिरचीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले. रबी हंगामातील इतर पिकांचे क्षेत्रसुद्धा वाढत आहे.
लाल मिरचीला अधिक भाव
हिरव्या मिरचीच्यात तुलनेत लाल मिरचीचा भाव टिकून राहते. भाव कमी असल्यास शेतकरी लाल मिरचीची विक्री काही काळ थांबवू शकतात. त्यामुळे वैरागड परिसरातील अनेक शेतकरी लाल मिरचीच लागवड करतात. फारच कमी शेतकरी हिरव्या मिरचीची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.