गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात महाविद्यालयातील पटसंख्या वर्षभरात २० हजारांनी घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:46 IST2025-06-10T16:45:33+5:302025-06-10T16:46:29+5:30
Gadchiroli : विद्यापीठ कॅम्पसमध्ये विविध कोर्सेसला प्रवेशासाठी विद्यार्थी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

The number of students in colleges in the Gondwana University area has decreased by 20,000 in a year.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात मुक्त विद्यापीठ आणि दूरस्थ शिक्षण अभ्यास केंद्रांमुळे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील पटसंख्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० हजारांनी घटली आहे.
विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, इंदिरा गांधी हिंदी विश्वविद्यालय, वर्धा, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठाचे अभ्यास केंद्रे सुरू आहेत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येवर फार गंभीर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. या विद्यापीठाची एकूण विद्यार्थी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २० हजारांनी कमी झालेली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक शैक्षणिक तुकड्या बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, असे प्राध्यापकांच्या संघटनेने म्हटले आहे. कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्त शिक्षण केंद्राला मंजुरी देऊ नये, यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
अभ्यासकेंद्रांना परवानगी देऊ नये
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण तसेच इतर विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांना परवानगी न देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे आणि सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या तीन विद्यापीठाने पूर्वपरवानगीबाबत ठराव केले पारित
पटसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिसभेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांना जिल्हाबंदी केली. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रात अभ्यास केंद्रे उघडताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याबाबत ठराव अधिसभेत पास केलेला आहे.
प्राधिकरणाने काय दिला अभिप्राय?
गोंडवाना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषद, सिनेट व व्यवस्थापन परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत उपरोक्त प्राधिकरणाने अभिप्राय दिला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर विद्यार्थ्यांअभावी भविष्यात अनेक महाविद्यालय बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.