अडीच वर्षांनंतर उलगडले खुनाचे रहस्य; जमीन वादातून माेठ्या वडिलानेच केली पुतण्याची हत्या
By गेापाल लाजुरकर | Updated: March 2, 2026 19:53 IST2026-03-02T19:52:21+5:302026-03-02T19:53:40+5:30
कोरची पोलिसांची कामगिरी : गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात पुरला; दोन नराधम अटकेत

The mystery of the murder is revealed after two and a half years; The grandfather killed his nephew over a land dispute
गडचिराेली/ काेरची : केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी माेठ्या वडिलाने पुतण्याचा कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती काेरची पाेलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात अडीच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे.
महेश श्यामसाय कळ्यामी (२३, रा. आंबेखारी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर रामदास अमरू कळ्यामी (५९, रा. आंबेखारी, ता. कोरची) आणि दसरू ठाकूरराम कल्लो (४२, रा. बोंडे, ता. कोरची) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर कोरची पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (१), २३८ (ब), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी आराेपींना कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेखारी येथील महेश श्यामसाय कळ्यामी हा तरुण नोव्हेंबर २०२४ मध्ये अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाइकांनी शोध घेऊनही तो न सापडल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, काही दिवसांनंतर जंगल परिसरात एक मानवी सांगाडा गाडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता. तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पंचनामा करून तो सांगाडा उत्खनन करून बाहेर काढण्यात आला आणि डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आला हाेता.
डीएनए अहवाल आल्यानंतर फिरविली तपासाची चक्रे
अडीच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. अखेर दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी डीएनए अहवाल प्राप्त झाला. या अहवालात तो सांगाडा महेश कळ्यामी याचाच असल्याचे निष्पन्न झाले. सांगाड्याची ओळख पटताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि संशयाची सुई महेशचे माेठे वडील रामदास कळ्यामी यांच्याकडे वळली. संशय बळावल्यानंतर पाेलिसी हिसका दाखवताच रामदासने गुन्ह्याची कबुली दिली.
जंगलात पाठलाग, निर्जनस्थळी कऱ्हाडीने सपासप वार
महेश आणि त्याचे मोठे वडील रामदास यांच्यात जमीन वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. जुलै २०२४ मध्ये या वादाने रौद्र रूप धारण केले. या रागातून रामदासने आपला साथीदार दसरू कल्लो याच्या मदतीने महेशचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी महेशचा जंगलात पाठलाग केला आणि एका निर्जनस्थळी त्याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याची हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेह जंगलातच खड्डा खोदून पुरून टाकला होता, ही बाब पाेलिस तपासादरम्यान समाेर आली.