शिक्षकांच्या समस्यांबाबत सभागृहात आवाज उठविणार
By Admin | Updated: February 1, 2015 22:56 IST2015-02-01T22:56:29+5:302015-02-01T22:56:29+5:30
आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण

शिक्षकांच्या समस्यांबाबत सभागृहात आवाज उठविणार
जिल्हा अधिवेशन : विजय वडेट्टीवार यांची ग्वाही
गडचिरोली : आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण शिक्षकांना न्याय देण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठविणार, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार तर अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा माजी शिक्षक आ. व्ही. यु. डायगव्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शिक्षण मंडळाचे सदस्य दिलीप गडपल्लीवार, संघटनेचे कोषाध्यक्ष शेमदेव चापले, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर अडबाले, सदस्य समशेर खॉ. पठाण, जिल्हाध्यक्ष दिगांबर भशारकर, एन. टी. काळबांधे, भंडाराचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, मुख्याध्यापिका सिंधू चहांदे, श्रीहरी शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, बी. टी. देशमुख व शिक्षक मतदार संघाचे माजी आ. व्ही. यु. डायगव्हाणे यांचेकडून सभागृहात प्रश्न कसे मांडावे हे आपण शिकलो. हेच आपले खरे गुरू आहेत. आजचे शिक्षक आमदार, शिक्षकांचे नसून राजकीय पक्षाचे आहेत. त्यांना शिक्षकांच्या समस्यांबाबत काही देणे-घेणे नाही. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला संघटनेचा सभासद समजावे, शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा उभारण्यास आपण सदैव तत्पर राहू, असे अभिवचनही आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
यावेळी माजी आ. डायगव्हाणे म्हणाले, केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षकांना वेतन व इतर सवलती मिळाव्या यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने १९९७ मध्ये पहिले आंदोलन केले. आरटीई कायदा न समजल्यामुळे राज्यात सध्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे. आरटीई कायद्यांतर्गत हजारो शिक्षकांना अतिरिक्त करण्यात आले. मात्र एकाही शिक्षकाने वा संघटनेने आरटीई कायद्याला विरोध केला नाही. शासनाने आरटीई कायद्याचा बाऊ करू नये, तसेच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता ढासळू देऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी सतिश आयलवार, दिलीप गडपल्लीवार, शेमदेव चापले, आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अजय लोंढे, संचालन एस. डी. चुधरी यांनी केले तर आभार मनोज हुलके यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)