गडचिरोलीतील सुरजागड बनणार देशातील पहिली प्रदूषणरहित 'ग्रीन माइन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST2025-06-05T12:34:42+5:302025-06-05T12:35:39+5:30
Gadchiroli : ३ लाखांहून अधिक रोपांची लागवड

Surjagad in Gadchiroli will become the country's first pollution-free 'green mine'
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली येथील सुरजागड लोहउत्खनन प्रकल्प देशातील पहिला ग्रीन माइन बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. खाणकामांमध्ये प्रत्येक टप्प्यांवर कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी प्रदूषणरहित यंत्रसामग्रीचा वापर केला जात असल्याची माहिती पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला लॉयडस् मेटल्स् अॅड एनर्जी लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी दिली.
यापूर्वी सूरजागड लोहखनिज खाणीने कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात दरवर्षी ३२ हजार टन इतकी लक्षणीय घट केली आहे. अक्षय ऊर्जा स्रोतांआधारे ही बचत दरवर्षी सुमारे ५० हजार टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. हरित वाहनांचा (भारत इलेक्ट्रिक वाहने) ताफा ३४ वरून ५६ इतका वाढला आहे, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि हरितगृह वायू उत्सर्जन आणि इंधन आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होते. २०२५-२६ मध्ये, एलएमईएल १०० हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा असणारी भारतातील पहिली खाण आहे. विद्युत-चालित कंप्रेसरचा अवलंब करून डिझेल-मुक्त ड्रिलिंग विकसित केले आहे, ज्यामुळे हाय-स्पीड डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
पहिली स्लरी पाइपलाइन
खाणकामांतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबतच 'ग्रीन लॉजिस्टिक्स' वर लक्ष केंद्रित करत आहे. हेडरी येथील ग्राइंडिंग प्लांटपासून कोनसरी येथील पेलेट प्लांटपर्यंत ८७ किमी लांबीची स्लरी पाइपलाइन सुरू करून लोहखनिज वाहतुकीतील कार्बन फूटप्रिंट कमी केला आहे.
या पाइपलाइनमुळे मालवाहतुकीचा खर्च प्रति टन ५००-६०० रुपयांनी कमी होईल, असा अंदाज आहे. स्लरी पाइपलाइनद्वारे रस्त्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन वार्षिक ६१,००० टन (५५%) कमी करता येते.
३ लाखांहून अधिक रोपांची लागवड
कंपनीने विविध ठिकाणी ३ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. सूरजागड लोहखनिज खाणीसाठी वळवण्यात आलेल्या ३७४.९० हेक्टर वन जमिनीच्या मोबदल्यात वनमंजुरीच्या अटींनुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि कारंजा तालुक्यांमध्ये ३७७.५८ हेक्टर खासगी जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करून दिली, पूरक वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) मध्ये २.४९ कोटी रुपये जमा केले. आर्वी तालुक्यात पर्यायी वनीकरण क्षेत्रात राज्य वन विभागाद्वारे २,५६,३८८ रोपे लावण्यात आली. सरजागड येथे खाण सुरक्षा क्षेत्रातही हजारो रोपांची लागवड केली आहे.
हेडरी, मंगेर येथील तलावांचे पुनरुज्जीवन
हेडरी आणि मंगेर येथील जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. तसेच निवासी संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांमध्ये प्रक्रिया केलेल्या ८५% पाण्यापैकी बहुतेक पाण्याचा पुनर्वापर होत आहे. या जलाशयांचे सुशोभीकरण केले आहे. फळे आणि औषधी झाडे देखील लावली आहेत. भूजल पुनर्भरण सुलभकरण्यासाठी जलसाठ्चांमध्ये दोन पुनर्भरण विहिरी बांधण्यात आल्या आहेत.