आतापर्यंत ३१ रूग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:36+5:30
गडचिरोली शहरातील गांधी वार्डातील पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्याच कुटुंबातील एकाचा अहवाल रविवारी निगेटीव्ह आला होता. मात्र पुन्हा तपासणी केली असता, त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत ३१ रूग्णांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्येत सोमवारी (दि.८) आणखी एकाची भर पडली. मात्र त्याचवेळी ४ जण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोनापासून मुक्त झालेल्या नागरिकांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. सोमवारी एका रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. त्यात अॅक्टिव रूग्ण केवळ १२ आहेत.
आतापर्यंत जिल्हाभरातील ३ हजार ४८ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ३ हजार ४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. तीन नमुन्यांचा अहवाल येणे शिल्लक आहे. सहा ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. सध्या १५७ नागरिक विलगीकरण कक्षात आहेत.
गडचिरोली शहरातील गांधी वार्डातील पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्याच कुटुंबातील एकाचा अहवाल रविवारी निगेटीव्ह आला होता. मात्र पुन्हा तपासणी केली असता, त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात आले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या चार जणांमध्ये मुलचेरा तालुक्यातील दोन, कुरखेडा व अहेरी येथील एकाचा समावेश आहे.
कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांचा रोष
सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्टपेठा येथील वयोवृध्द नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याला हैदराबाद येथे दवाखाण्यात भरती करण्यासाठी सिरोंचा येथील वार्ड क्रमांक ७ मधील वाहनचालक वाहन घेऊन गेला होता. वयोवृध्द नागरिकाचा कोरोना अहवाल ३१ मे ला पॉझिटीव्ह आल्यापासून संबंधित वार्डाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करून सदर वार्ड सील करण्यात आला. मागील नऊ दिवसांपासून या वार्डातील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरचे राशन, भाजीपाला व अन्य साहित्य संपत आले आहेत. यामुळे महिला व नागरिक चांगलेच संतापले. त्यांनी पोलीस विभागाने लावलेल्या बॅरेकजवळ गोळा होऊन प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. ही माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील व पोलीस निरिक्षक अजय अहीरकर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नागरिकांची समजून काढली. तसेच भाजीपाला, किराणा, रेशन व अन्य साहित्य गेटजवळ उपलब्ध करून दिले.
देसाईगंज कोरोनामुक्त कसे?
देसाईगंज हे गडचिरोली शहरानंतरचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. या तालुक्याच्या सीमा भंडारा जिल्ह्याला लागून आहेत. जिल्ह्यातील एकमेव व्यापारी शहर म्हणून देसाईगंजमध्ये जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ असते. या शहरातील अनेक नागरिक देश, विदेशात राहतात. कोरोनामुळे ते देसाईगंज शहरात परत आले आहेत. मात्र अजूनपर्यंत देसाईगंज शहरातील एकही नागरिक कोरोनाबाधीत आढळून आलेला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असू शकतो, मात्र ते याबाबतची माहिती लपवत तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. यादृष्टीने तालुका प्रशासनाने अधिक सतर्क राहून चौकशी करण्याची गरज आहे.
मास्क लावून नागरिक बिनधास्त
१८ मे रोजी जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला. त्यानंतर रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्याचबरोबर बरे होणाºया रूग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाविषयी असलेली भिती कमी होत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. त्यावेळी जेवढी भिती होती, त्यापेक्षा आता भिती कमी झाली आहे. मास्क घालून नागरिक बिनधास्त आपली कामे करीत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कामे सुरू झाल्याने आता अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची शक्यता आहे.