म्हणे गिरीधर ‘भगोडा’, माओवाद्यांची आगपाखड, आत्मसर्मपणानंतर २४ तासांतच पत्रक
By संजय तिपाले | Updated: June 23, 2024 20:21 IST2024-06-23T20:21:32+5:302024-06-23T20:21:57+5:30
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांची व्यूहरचना आखून त्याआधारे घातपाती कारवाया करणारा जहाल नेता नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने २२ जूनला पत्नी संगीतासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर २४ तासांच्या आतच माओवाद्यांनी पत्रक जारी करुन आगपाखड केली आहे.

म्हणे गिरीधर ‘भगोडा’, माओवाद्यांची आगपाखड, आत्मसर्मपणानंतर २४ तासांतच पत्रक
-संजय तिपाले
गडचिरोली - जिल्ह्यातील नक्षल्यांची व्यूहरचना आखून त्याआधारे घातपाती कारवाया करणारा जहाल नेता नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने २२ जूनला पत्नी संगीतासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर २४ तासांच्या आतच माओवाद्यांनी पत्रक जारी करुन आगपाखड केली आहे. या पत्रकात गिरीधरला ‘भगोडा’ संबोधित केले असून, जनता त्यास कधीच माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.
नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने नक्षल चळवळीसाठी २८ वर्षे दिली होती. सदस्य ते नेता असा प्रवास त्याने केला. १७९ गुन्हे नोंद असल्याने तो पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड होता. दरम्यान, त्याच्यावर शासनाचे २५ लाख रुपयांचे तर पत्नी संगीता हिच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. २२ जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्यानंतर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांनी शरण यावे किंवा बंदुकीच्या गोळ्या खाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड इशारा देत गिरीधर व त्याच्या पत्नीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते.
यानंतर माओवाद्यांच्या पश्चिम सबझोजनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले. १९९६ मध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले, परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याला समर्थपणे तोंड देण्याऐवजी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही केली आहे.
दिवंगत नक्षल नेत्यांचा उल्लेख
दिवंगत नक्षल नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, इंदिरा, वासू यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करुन श्रीनिवास याने गडचिरोलीच्या नक्षल आंदोलनाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल, असे म्हटले आहे.
अनेक नक्षलवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येत आहेत, त्यामुळे या चळवळीत सक्रिय असलेल्यांमध्ये नैराश्य आले आहे. यातूनच ते अशाप्रकारे पत्रक काढून आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, पोलिस सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहेत.
- नीलोत्पल
(पोलिस अधीक्षक, गडचिरोली)