राकाँचा भाजपसोबत घरोबा कायमच
By Admin | Updated: August 11, 2014 23:55 IST2014-08-11T23:55:05+5:302014-08-11T23:55:05+5:30
२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा

राकाँचा भाजपसोबत घरोबा कायमच
गडचिरोली : २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली व काँग्रेसला सत्तेबाहेर केले. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतरही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेतील सत्तेचा मधुचंद्र अद्याप समाप्त झालेला नाही. गेल्या महिन्यात नागपूर विभागातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमक्ष या मुद्यावर अनेक मंत्री व नेत्यांनी ही बाब उपस्थित केली होती. व राकाँने भाजपसोबतची युती तोडावी, अशी मागणी केलली होती. गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० सदस्य आहेत. या १० सदस्यांच्या भरवशावर भाजपशी हातमिळवणी करीत २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प.चे अध्यक्षपद भाग्यश्री आत्राम यांच्या रूपाने पटकावले. तर भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे हे उपाध्यक्ष झालेत. तर भाजप नेत्यांचे वर्चस्व असलेल्या युवाशक्ती आघाडीने दोन सभापती पद आपल्याकडे ठेवले. तर राकाँला व भाजपला एक-एक सभापती पद देण्यात आले. राज्यभरापासून जिल्हाभरापर्यंतचे राकाँचे नेते बेंबीच्या देठापासून जातीयवादी शक्तीचा विरोध करण्याचे आवाहन जनतेला करीत असताना गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या जिल्हा परिषदांमध्ये मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा मधुचंद्र सुरूच आहे. तो अद्यापही समाप्त झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आपल्या मित्रपक्षावर नाराज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेतील राकाँच्या भाजपसोबत असलेल्या युतीमुळेच आघाडीच्या उमेदवाराला फटका बसला. हे कुठले धर्मनिरपेक्षवादी असा प्रश्न मतदारांनी उपस्थित केल्यावर त्याचे उत्तर राकाँ व काँग्रेस नेत्यांजवळ नव्हते, असा सूर काँग्रेसने लावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जातानाही हा प्रश्न कायमच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तत्व आणि निष्ठांचे राजकारण करताना पहिले जिल्हा परिषदेतील सत्ता सोडावी त्यानंतरच निवडणुकीला समोर जावे, असा सूर राकाँच्याही गोट्यात उमटला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसही जिल्ह्यात एकसंघ राहिली नसून जिल्हा परिषदेतील राकाँमध्ये विभाजन झाले आहे. जि.प. व नगर परिषदांमध्ये राकाँत जोरदार गटबाजी आहे.