रक्षक बनले भक्षक
By Admin | Updated: January 5, 2015 23:02 IST2015-01-05T23:02:16+5:302015-01-05T23:02:16+5:30
आरक्षित वनक्षेत्राच्या परिसरात साधा प्रवेश करायचे म्हटले तरी तेथे परवानगी घ्यावी लागते. या परिसरात कायदेशीर कामे करण्याकरितादेखील परवानगीची गरज असते. मात्र त्याला अहेरी

रक्षक बनले भक्षक
जेसीबी, ट्रॅक्टर सोडले : मलमपल्ली आरक्षित जंगलात वन विभागाकडून अवैध उत्खनन
ए. आर. खान - अहेरी
आरक्षित वनक्षेत्राच्या परिसरात साधा प्रवेश करायचे म्हटले तरी तेथे परवानगी घ्यावी लागते. या परिसरात कायदेशीर कामे करण्याकरितादेखील परवानगीची गरज असते. मात्र त्याला अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी अपवाद असावेत, असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. ‘रिझर्व्ह झोन’ असलेल्या आलापल्ली वनविभागांतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी संबंधीत वनाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र मलमपल्ली गावात वनविभागाच्याच या अधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आलापल्ली वनविभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रात मलमपल्ली गावातील पोच मार्गाच्या कडेला आलापल्ली-सिरोंचा राजमार्गावर आरक्षित जंगल परिसरात कक्ष क्रमांक २८ मध्ये २ जानेवारीला दुपारी अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करण्यात आले. गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची खासगी कामांकरिता विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गालगत मलमपल्ली राखीव जंगल भागात कक्ष क्रमांक २८ मध्ये अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यांची शहानिशा करण्याकरिता प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा तेथे एक जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टर ट्राली व वाहनचालक आढळून आले. यावेळी त्यांच्यासोबत वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. थोरात व वनरक्षक अतुल हजारे हेदेखील उपस्थित होते.
घटनास्थळावर अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व दोन ट्रॅक्टर ट्राली थोरात यांनी भाड्याने आणल्याच्या बाबीला वनरक्षक हजारे यांनी दुजोरा दिला. अवैध उत्खनन करण्यात आलेल्या स्थळावर ट्रॅक्टर ट्राली व जेसीबी मशीन असतानाही ते जप्त करण्यात आले नाही. उलट कोणतीही कारवाई न करता ते सोडून देण्यात आले. या उत्खननामुळे आरक्षित कक्ष क्रमांक २८ मध्ये वयोमर्यादा अपूर्ण असलेले अनेक झाडांची मूळे बाहेर पडली आहेत. दोन मीटर चौरस खड्ड्यात खोदकाम करण्यात आले आहे. राखीव जंगलात हे खोदकाम झाले असल्यामुळे पावसाळ्यात वादळाने वृक्ष कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी तत्काळ आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी अग्रवाल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. आत्राम यांना दिले आहेत.