मागणी घटल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:42+5:30
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही.

मागणी घटल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला स्थानिकस्तरावरच कमी किमतीत विकावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान होत आहे. जोगीसाखरासह शंकरनगर, रामपूर आदी गावांमध्ये भेंडीचे बऱ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु मागणी घटल्याने कमी किमतीत भेंडीची विक्री करावी लागत आहे.
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही. गाव सिल केल्याने बाहेरच्यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी गावातील भाजीपाला उत्पादकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटला. भाजीपाला विक्री करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील झाडालाच भेंडी, वांगी, कारले पिकल्यागत झाले. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने भाजीपाला बाहेर विक्री करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. शंकरनगर व जोगीसाखरा गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी चिंताग्रस्त असतानाच खरीप हंगामाचे आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची विक्री करण्याकरिता योग्य व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. याचा जोरदार फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. मिळेल त्या प्रमाणात शेतकºयांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केला. परंतु यात त्यांना तोटाच सहन करवा लागला.
महिनाभरच विक्री
अनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली आहे. पऱ्ह्यांची वाढ झाल्यानंतर २१ ते २२ दिवसांनी रोवणीला सुरूवात होईल. अशा स्थितीत शेतात असलेली भाजीपाला व फळभाज्यांच्या बागा नष्ट करून त्याजागी धानाची लागवड शेतकरी करणार आहेत. त्यामुळे ज्याच्यांकडे सध्या भेंडी, वांगी, कारले व अन्य भाजीपाल्याच्या बागा आहेत, अशा शेतकऱ्यांना जवळपास महिना ते दीड महिना भाजीपाला विक्री करण्यास मिळणार आहे.