विदर्भ गर्जना यात्रेत सहभागी व्हा
By Admin | Updated: January 31, 2015 23:21 IST2015-01-31T23:21:11+5:302015-01-31T23:21:11+5:30
विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा

विदर्भ गर्जना यात्रेत सहभागी व्हा
१ मार्चला देसाईगंजात : विदर्भ आंदोलन समितीचे आवाहन
गडचिरोली : विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवत विदर्भातील जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले. सत्ता येताच भाजपाने स्वतंत्र विदर्भ देण्याऐवजी आपण विदर्भाचा विकास करू, असे आश्वासन देणे सुरू केले आहे. मात्र दुसऱ्या बाजुला राज्याच्या तिजोरीत खळखळाट असल्याचेही सांगण्यात येत आहे. तिजोरी रिकामी असतांना विदर्भाचा विकास कसा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसप्रमाणे भाजपासुद्धा वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे. विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढली जाणार आहे. विदर्भातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून उर्वरित महाराष्ट्राचा विकास केला जात आहे. याबाबत यात्रेदरम्यान जनजागृती केली जाणार आहे. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत ३१ मार्च रोजी संपत असून त्याला मुदतवाढ देण्याऐवजी विदर्भ राज्य देण्याची मागणी तीव्र करण्यासाठी आंदोलन उभे केले जाणार आहे.
सदर यात्रेला १५ फेब्रुवारी रोजी नागपूरपासून प्रारंभ होणार आहे. विदर्भातील मुख्य ठिकाणी सभा घेत सदर यात्रा १ मार्च रोजी देसाईगंज येथे पोहोचणार आहे. देसाईगंज येथे सायंकाळी ५ वाजता सभा घेतल्यानंतर यात्रा आरमोरी येथे येणार आहे. आरमोरी येथे रात्री ७ वाजता सभा व तिथेच मुक्कामी राहणार आहे. २ मार्च रोजी ब्रह्मपुरी, नागभिड, सावली व मुल येथे जाणार आहे. ३ मार्च रोजी गडचिरोली येथे दुपारी २ वाजता सभा घेण्यात येणार असून त्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकुर, रमेश भुरसे, समय्या पसुला, राजू जक्कलवार, अमिता मडावी, सुधाकर नाईक, काशीनाथ नागोसे, सिद्धार्थ नंदेश्वर, आत्माराम भागडकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)