अवकाळी पावसाने भिजले केंद्रावरचे धान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:19+5:30
धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र धानाची आवक वाढल्याने सदर शेड सुध्दा अपुरे पडत आहे. परिणामी काही धान उघड्यावरच ठेवले आहे.

अवकाळी पावसाने भिजले केंद्रावरचे धान
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरात गुरूवारी रात्री झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेकडो शेतकऱ्यांचे धान ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र धानाची आवक वाढल्याने सदर शेड सुध्दा अपुरे पडत आहे. परिणामी काही धान उघड्यावरच ठेवले आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही शेतकऱ्यांनी ताडपत्री झाकून धानाच्या पोत्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपुरा ठरला. बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पाण्यात भिजले. जोपर्यंत लिलाव होऊन काटा होत नाही, तोपर्यंत सदर धानाची जबाबदारी शेतकऱ्याची राहते. अनेक शेतकऱ्यांच्या धानाचे लिलाव व काटे सुध्दा झाले नाहीत. धान भिजलेल्याचा तोटा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणू नये, असे सूचना फलक कृषी उत्पन्न बाजार समितीने लावले आहे.
पावसामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद
आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत ५० पेक्षा अधिक आधारभूत धान खेरेदी केंद्र चालविले जात आहेत. मागील १५ दिवसांपासून धान खरेदीला वेग आला होता. मात्र मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच गुरूवारी व शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊसही झाला. काही शेतकऱ्यांचे धान अजूनही केंद्रावच आहे. अवकाळी पावसाने धान भिजले. जोपर्यंत धानाचा काटा होत नाही, तोपर्यंत धानाची जबाबदारी शेतकऱ्याची राहते. भिजलेले धान खरेदी करण्यास नकार दिल्यास याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्तता आहे. नवीन धान ेकेंद्रावर आणण्यास मनाई करावी मात्र जेवढे धान शेतकऱ्यांनी केंद्रावर आणले आहे. त्याचा काटा करून ते गोदामात ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.