पर्यटनाने रोजगाराच्या संधी
By Admin | Updated: August 11, 2014 23:56 IST2014-08-11T23:56:28+5:302014-08-11T23:56:28+5:30
गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

पर्यटनाने रोजगाराच्या संधी
रमेश बोरकर - मालेवाडा
गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र शासनाचे दुर्लक्ष व नक्षल्यांची दहशत यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही.
पर्यटन स्थळ म्हणून विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडेश्वर देवालय, चपराळा येथील त्रिवेणी संगम, अभयारण्य, रेगडी येथील कन्नमवार जलाशय, आलापल्ली येथील ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, आलापल्ली येथे रानम्हशींसाठी राखीव असलेले अभयारण्य, कमलापूर येथील हत्तीकॅम्प, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले कालेश्वर मंदिर, लाकडाचे विश्रामगृह, बांडिया व पामूलगौतम नदीचा संगम, सोमनूरच्या त्रिवेणी संगम, इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी येथील गरम पाण्याचे झरे, लख्खामंडा येथील प्राचीण लाक्षागृह, नैसर्गिक खुले रंगमंच, लोक बिरादरी प्रकल्प, भामरागड अभयारण्य, माडिया आदिवासी संस्कृती, सुरजागड येथील लोहखनिज व सुरजागडचा किल्ला, आमगाव येथील प्राचीन मंदिर, डोंगरगाव, अरततोंडी येथील शिवमंदिरे, खोब्रामेंढा, टिपागड येथील भूईपोट किल्ले, वैरागड येथील प्राचीन मंदिर, गोरजाईचा डोह, किल्ल्याचे प्रवेशद्वार, धानोरा, डोंगरगाव सोनसरी पहाडावरील चिचपाणी झरा अशी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश पर्यटन स्थळे दुर्गम व घनदाट जंगलात आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देतांना बऱ्याच अडचणींचा सामना पर्यटकांना करावा लागतो. यातील काही स्थळांपर्यत अजूनही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे कित्येक किलोमीटर जागा पायी जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून या स्थळांची डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे ही स्थळे जीर्णावस्थेपर्यंत पोहोचली आहेत. अप्रतीम, ऐतिहासीक व स्थळे असले तरी याकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होण्यामागे नक्षल्यांची दहशत हे सुध्दा महत्वाचे कारण आहे.
या स्थळांचा विकास झाला असता तर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळाली असती. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असता. पर्यटकांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चहा, अल्पोपहार उपलब्ध करून देणे, पर्यटकांची अडचण दूर करणे, त्यांना रस्ते, थांबे, पर्यटनस्थळांविषयीची माहिती देणे आदींच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. रोजगार पुरविण्यासाठी सध्या वनविभाग पुढाकार घेत आहे. पर्यटनस्थळांचा विकास केल्यास रोजगारात भर पडण्यास मदत होईल.