रांगी येथे धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:34+5:30
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्था रांगीच्या वतीने येथील केंद्रावर आतापर्यंत १६ हजार ५८२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी महामंडळाच्या वतीने केवळ दोन हजार क्विंटल धानाची राईस मिलर्समार्फत उचल करण्यात आली. त्यानंतर १४ हजार ५८२ क्विंटल धान शिल्लक राहिला. यापैकी ७ हजार क्विंटल धान गोदामात साठविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था रांगीच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात धानाची खरेदी रांगी येथील केंद्रावर करण्यात येत आहे. या केंद्रावर धानाची आवक वाढली असून गोदाम पूर्णत: भरले आहे. धान उचल करण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने साडेसात क्विंटलवर धान उघड्यावर आहे. परिणामी अवकाळी पावसाने हे धान भिजून नुकसानीची शक्यता आहे.
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्था रांगीच्या वतीने येथील केंद्रावर आतापर्यंत १६ हजार ५८२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी महामंडळाच्या वतीने केवळ दोन हजार क्विंटल धानाची राईस मिलर्समार्फत उचल करण्यात आली. त्यानंतर १४ हजार ५८२ क्विंटल धान शिल्लक राहिला. यापैकी ७ हजार क्विंटल धान गोदामात साठविण्यात आला. आता ७ हजार ५८२ क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे या धानाचे नुकसान होऊ नये, यासाठी संस्थेच्या कार्यालयाच्या वतीने ताडपत्री झाकून हे धान ठेवण्यात आले आहे.
रांगी येथे खरेदी केलेले धान साठविण्यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडे एकच गोदाम आहे. या केंद्राला परिसरातील निमगाव, बोरी, रांगी, मासरगाटा, निमनवाडा, खेडी आदी गावे जोडण्यात आली आहे. या सर्व गावातून सदर केंद्रावर अनेक शेतकरी आपले धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे अल्पावधीतच येथील एकमेव गोदाम धानाने पूर्णत: भरले. आता धान साठवणुकीसाठी कोणतीही जागा शिल्लक नाही. येथे आणखी एका गोदामाची निर्मिती करणे गरजेचे आहे. धानोरा तालुक्यातील अनेक आविका संस्थेच्या केंद्रांवर अशीच स्थिती आहे. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
व्यापाऱ्यांकडूनही खरेदी
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत धानोरा तालुक्यात आविका संस्थेचे जवळपास १० केंद्र आहेत. या केंद्रांवर धानाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून काटा होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी काही शेतकरी व्यापाºयांना आपले धान विकत आहेत.