आधुनिकतेच्या लाटेत नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 16:03 IST2022-02-02T15:52:13+5:302022-02-02T16:03:45+5:30

विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यात मूळ निवासी असलेला नाथजोगी समाजाचे नागरिक वर्षातील चार महिने हातात किंदरी घेऊन पोट भरण्यासाठी धडपडत असतात.

nomadic life of nath yogi community | आधुनिकतेच्या लाटेत नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त

आधुनिकतेच्या लाटेत नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त

ठळक मुद्देसमाजबांधव अजूनही उपेक्षितच अनेक पिढ्यांपासून उपेक्षाच वाट्याला

प्रदीप बोडणे

गडचिरोली : 'श्रावणबाळ सुताराच्या घरी गेला, कावड कातुन देगा मला, आई बापाला नेतो काशीला..!" अशा धार्मिक, पौराणिक कथांचा संदर्भ घेत त्यावर सुंदर गीतरचना करून किंदरीच्या सुरात सूर मिसळवणारे नाथजोगी अलिकडे दुर्मिळ झाले आहेत.

आधुनिकतेच्या लाटेत भगवान शंकर, चिलियाबाळ, श्रावणबाळ, पंढरीचा पांडुरंग यांचा सात्त्विक आणि सत्य विचार, गीतावचन आपल्या किंदरीच्या स्वरातून घरोघरी पोहोचवणाऱ्या नाथजोगींच्या किंदरीचे स्वर त्यामुळे मंदावल्याचे दिसत आहे.

विकासाच्या महामार्गापासून कोसो दूर असलेला नाथजोगी समाज आजही वस्ती पाड्यावर राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या समाजातील मुले आता थोडेफार शिक्षण घेऊ लागली, पण पिढ्यानपिढ्या उपेक्षित राहिलेला समाज सरकारी दप्तरी आजही नोकरीला नाही. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वाट्याला आलेल्या थोड्याशा जमिनीच्या तुकड्यावर संसाराचा गाडा चालवणे, एखादा छोटा-मोठा व्यवसाय करणे आदी काम या समाजाचे लोक करतात. काहीच करण्याची ऐपत नसेल तर हातात किंदरी घेऊन चार दारात जाऊन संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करणे अशी नाथजोगी समाजाची परिस्थिती आहे.

विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यात मूळ निवासी असलेला नाथजोगी समाजाचे नागरिक वर्षातील चार महिने हातात किंदरी घेऊन पोट भरण्यासाठी धडपडत असतात. मिळेल त्या ठिकाणी आपले बिन्हऱ्हाड मांडून महाराष्ट्रभर भ्रमंती करीत असतात.

माणूस बदलल्याची खंत

- आपल्या भ्रमंतीत असलेला नामदेव माडकर हा नाथजोगी सांगतो.. आता शब्दाला जगणारे लोक राहिले नाही. पैसा-आडक्याच्या मागे धावणारे युग आहे. राजा हरिश्चंद्र गोसाव्याने स्वप्नात राज्य दान दिले आणि राजाने ते सत्यात उतरवले आणि दुसऱ्या दिवशी गोसाव्याला ते राज्य सोपवून साधूचे वस्त्र धारण करून राजा हरिश्चंद्र वनवासाता निघून गेला. राजा हरिश्चंद्राचे अवतार आपण नसलो तरी, आज काही प्रामाणिक माणसांमुळे समाजाचा गाडा सुरळीत चालू आहे.

वयाची सत्तरी उलटलेला हा गोसावी सांगतो.. पूर्वी पसाभर भिक्षा मागायला घरोघरी जावे लागत नव्हते. गोरखनाथाच्या किंदरीचे स्वर रस्त्यावर घुमू लागले की, घराची सुवासीन हातात भिक्षा घेऊन भरल्या मनाने गोसाव्याला दान देई. आज घरोघरी जाऊनही धान्य मिळणे अडचणीचे झाले आहे. इतका माणूस रिता झाला आहे. तरीपण ईश्वर स्मरणात जीवनाची सार्थकता आहे, असे नाथजोगी यांनी सांगितले.

Web Title: nomadic life of nath yogi community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.