नवीन पुस्तके नवीन शाळा

By Admin | Updated: June 21, 2014 23:57 IST2014-06-21T23:57:57+5:302014-06-21T23:57:57+5:30

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन शैक्षणिक साहित्य, नवे मित्र यांच्या जोडीलाच आता नवीन शाळाही विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे.

New schools for new books | नवीन पुस्तके नवीन शाळा

नवीन पुस्तके नवीन शाळा

गडचिरोली : शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन शैक्षणिक साहित्य, नवे मित्र यांच्या जोडीलाच आता नवीन शाळाही विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे. सर्वच नवीन असल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर्षी सुमारे २ कोटी ४० लाख रूपये खर्चुन १३९ शाळेच्या इमारती बांधल्या आहेत. तर काही इमारतींची दुरूस्ती केली आहे.
विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. विदर्भामध्ये पावसाचे आगमन उशिरा होते. त्यामुळे जून महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत कधी-कधी उन्हाळाच राहतो. त्यामुळे विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होतात. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी संस्मरणीय राहतो. विद्यार्थी नुकताच पुढच्या वर्गात जात असल्याने त्याला नवीन वर्गाची ओढ राहते. त्याचबरोबर आता शासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देतात. त्याच्या जोडीला गणवेश, नवीन शैक्षणिक साहित्यही असतातच. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याला सर्वच नवीन मिळत असल्याने त्याचा आनंद आणखी द्विगुणीत होण्यास मदत होते.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा राज्याच्या निर्मितीनंतर बांधण्यात आल्या आहेत. या शाळांचे छत कौलारू आहे. बऱ्याच दिवसामुळे शाळांच्या भिंतीही जीर्ण होऊन कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याने सदर इमारती निर्लेखीत करून त्यांच्याऐवजी नवीन इमारती बांधण्यात येत आहेत. मागील वर्षी २ कोटी ४० लाख रूपये खर्चुन १३९ शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या सर्व इमारती नवीन आराखड्यानुसार बांधण्यात आल्या आहेत.
नवीन इमारती बांधण्यात आल्या असल्या तरी जिल्हाभरात शेकडो इमारती जीर्णावस्थेत आहेत. याच इमारतीमध्ये विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. तर नाईलाजास्तव शिक्षकसुद्धा शिक्षणाचे धडे देत आहेत. इमारती निर्लेखीत करण्याचा प्रस्ताव संबंधित पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी इमारत निर्लेखीत करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहे. मात्र सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले नसल्याने जीर्ण इमारतींमध्येच अनेक शाळा सुरू आहेत. इमारतींची अवस्था लक्षात घेऊन नवीन इमारती बांधण्यात याव्या, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र निधी नसल्याने नवीन इमारती बांधण्यास व जुन्या इमारतींची दुरूस्ती करण्यास फार मोठी अडचण जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला येत होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही अडचण जिल्हा नियोजन समितीसमोर मांडली असता, ५ कोटी ८६ लाख रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बांधकाम करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: New schools for new books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.