'भूपती'च्या धक्क्यानंतर चळवळ खिळखिळी, ११ जणांनी केले आत्मसमर्पण
By संजय तिपाले | Updated: March 19, 2026 18:27 IST2026-03-19T18:26:42+5:302026-03-19T18:27:59+5:30
Gadchiroli : सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह साजरा होत असताना, गडचिरोलीच्या जंगलातून एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. माओवादाच्या अंधकारातून बाहेर पडत ११ जहाल माओवाद्यांनी १९ मार्च रोजी जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले.

Movement in disarray after 'Bhupati' setback, 11 people surrender
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह साजरा होत असताना, गडचिरोलीच्या जंगलातून एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. माओवादाच्या अंधकारातून बाहेर पडत ११ जहाल माओवाद्यांनी १९ मार्च रोजी जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. रक्ताने माखलेला हिंसेचा मार्ग सोडून या माओवाद्यांनी आपल्या आयुष्यात 'शांततेची गुढी' उभारली आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात २ डिव्हिजनल सदस्य, १ एरिया कमिटी सचिव, कमांडर आणि पीपीसीएम स्तरावरील वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण ११ सदस्यांनी शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, या सर्वांवर शासनाने एकत्रितपणे ६६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये यांचा समावेश
सोनी उर्फ वाली मडावी (डिव्हीजनल – कुरखेडा दलम), दुर्गेश उर्फ रामराव आयतु मुडामी (एरिया कमिटी सचिव – इंद्रावती एरिया कमिटी), सुखलाल बोबरा कावासी (कमांडर – पश्चिम बुरु एरिया टीम), शांती उर्फ सोमरी रामलाम (पीपीसीएम – पश्चिम बुरु एरिया टीम), मुन्नक्का उर्फ रूपनक्का पोडियम (एसीएम – भामरागड दलम), गणेश उर्फ कोवासी (सदस्य – कंपनी क्र. १०), मिंको उर्फ जमनी काचा मडावी (सदस्य – कंपनी क्र. १०), पुनू उर्फ बंडे वेल्हे (सदस्य – कंपनी क्र. १०), सुकमती उर्फ बंडे वेल्हे (सदस्य – सेंड्रा दलम), रमेश पांडु मडावी (सदस्य – मोबाइल पॉलिटिकल स्कूल), किशोर मडावी वासम (मिलिशिया कमांडर – सेंड्रा दलम) या सर्वांनी हिंसेचा मार्ग त्यागून आत्मसमर्पण केले.
'भूपती'च्या धक्क्यानंतर चळवळ खिळखिळी
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुलावू वेणुगापाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याच्या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर माओवादी चळवळीला जो सुरुंग लागला, तो आता अधिक गडद झाला आहे. आजच्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीतील माओवादाचा 'बालेकिल्ला' पूर्णपणे कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
"आजचा दिवस गडचिरोलीसाठी खऱ्या अर्थाने नववर्षाची सुरुवात आहे. ज्यांनी शस्त्रे सोडली आहेत, त्यांचे पोलिस दलातर्फे योग्य पुनर्वसन केले जाईल. हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे हे मोठे पाऊल आहे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली