गडचिरोलीतही होऊ शकतो 'कुंडमळा' ; आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:39 IST2025-06-17T17:37:28+5:302025-06-17T17:39:32+5:30
Gadchiroli : अरुंद, विनाकठड्यांच्या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत

'Kundamala' can happen in Gadchiroli too; Four bridges on Armori road are dangerous
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पर्यटनस्थळावर इंद्रायणी पुलावरील लोखंडी पूल कोसळून चौघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आदिवासीबहुल व माओवादप्रभावित गडचिरोलीतील रस्ते व पुलांची अवस्था पाहता येथेही 'कुंडमळा' होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक असून दक्षिण गडचिरोलीत डझनभर पुलांची कामे खोळंबलेली आहेत. दुसरीकडे उत्तर गडचिरोलीत तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच पूल खचल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. 'कुंडमळा' घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामांची ही झाडाझडती.
५०० कोटी एवढे बजेट आरमोरी-गडचिरोली महामार्गाचे झाले आहे. ब्रह्मपुरीपर्यंत समृद्धी महामार्ग होणार असल्याने जिल्ह्यातील रहदारी वाढू शकते. त्यामुळे हा महामार्ग आता दुपदरी ऐवजी चौपदरी होईल.
पुलाला पडल्या भेगा
अहेरी तालुक्यातील लक्ष्मण नाल्यावरील पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो.
या पुलांवरुन जाताना इकडे-तिकडे पाहू नका
आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) वर चार पूल अरुंद असून कठडेही गायब आहेत. त्यामुळे तेथून प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तथून आरमोरीजवळ गाढवी नदीवर, डोंगरगाव (भु.) जवळच्या खोब्रागडी नदीवर, वसाजवळच्या कोलांडी नाल्यावर तसेच साखराजवळच्या पाल नदीवरील पुलांचा यात समावेश आहे. या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत.