टॉवर्समुळे आजारांत वाढ
By Admin | Updated: June 23, 2014 00:05 IST2014-06-23T00:05:58+5:302014-06-23T00:05:58+5:30
मागील आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहेत. मात्र टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार

टॉवर्समुळे आजारांत वाढ
विलास चिलबुले - आरमोरी
मागील आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहेत. मात्र टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. परंतु शहरातील बहुतांश टॉवर बेकायदेशिर रित्या उभे आहेत. नियमाला बगल देऊन काही टॉवर शाळा, कॉन्व्हेंटच्या आवारात असल्याने परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना कर्करोग, स्मृतिभंश यासह डोकेदुखी, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, रोग प्रतिबंधक शक्ती कमी होणे आदी आजार जडत आहेत.
टॉवर जेवढे जास्त तेवढा नेटवर्क चांगला असे समीकरण बनले असल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल कंपन्या मोक्याच्या जागा शोधून टॉवर उभारत आहेत. शहरातील बरेचसे टॉवर भर वस्तीत उभारले आहेत. आरमोरी शहरात जवळपास सात ते आठ टॉवर असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणामही पडत आहे. ग्राहकांची संख्या वाढल्याने ग्राहकांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. याबरोबरच टॉवरची संख्याही वाढली आहे. खुल्या जागेत तसेच इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी मालकांना दरमहा दहा ते पंधरा हजार रूपयापर्यंत भाडे मिळत असते. या रकमेसाठी कोणत्याही स्वरूपाच्या दुष्परिणामाची पर्वा न करता टॉवरसाठी अनुमती दिली जाते. रहिवासी, शाळा, कॉन्व्हेंटच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. टॉवरमधून निघणाऱ्या रेडीओ लहरीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने लागू केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. टॉवरमुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अतिदाबाच्या लहरीपणामुळे कमी वजनाच्या पक्ष्यांच्या शरिरातील तापमानात वाढ होत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे चिमणी, कावळ्याचे अस्तित्व शहरातून नष्ट होत आहे. २०० फुट उंचीच्या टॉवरमधून निर्माण होणाऱ्या रेडिओ लहरी जमीन समांतर जातात. टॉवरमधील विद्युत चुंबकीय लहरींचा मानवी शरीरावर परिणाम होऊन कर्करोग यासह गर्भवती महिलांवरही दुष्परिणाम होत आहेत.