चौपदरीकरणात ‘बायपास’ला आशा
By Admin | Updated: January 4, 2015 23:12 IST2015-01-04T23:12:43+5:302015-01-04T23:12:43+5:30
गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज

चौपदरीकरणात ‘बायपास’ला आशा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या नगर पालिका क्षेत्रांमध्ये बायपास रस्ते तसेच रिंगरोडचे काम रखडलेले आहे. आता राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने त्याचवेळी या शहराच्या बायपास रस्त्याच्या कामांना त्यासोबत चालना मिळेल व बायपास रस्त्याची समस्या मार्गी लागेल, अशी आशा आहे.
गडचिरोली बायपास रस्ता राज्य महामार्ग २७५ (आरमोरी रस्ता) ते राज्य महामार्ग ७ (धानोरा रस्त्याजळील लांझेडा) ते राज्य महामार्ग २८० (फॉरेस्ट डेपोजवळ) ते राज्य जिल्हा रस्ता ३१ (फॉरेस्ट नर्सरी) ते राज्य महामार्ग २७५ (सेमाना देवस्थानजवळ) ते महाराष्ट्र राज्य मार्ग ७ (नवेगावजवळ) असा असून या संपूर्ण रस्त्याची लांबी गडचिरोली तालुक्यात १०.६४ किमीची राहणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १००.२७ कोटी रूपयांची खर्च अपेक्षीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग नं. १ गडचिरोली यांनी राज्य शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
या रस्त्यामध्ये शेती व वनजमीनसुध्दा जाणार आहे. या बायपास रस्त्यामुळे गडचिरोली शहरातील ४२ हजार ४६८, इंदाळा येथील १ हजार २६०, नवेगाव येथील ३ हजार ६७७, मुरखळा येथील १ हजार ४१०, विसापूर येथील १ हजार ६४५, लांझेडा येथील १ हजार ९५७ लोकांना फायदा होणार आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. या बायपास मार्गासाठी ११.६५ हेक्टर जमीन वन विभागाची तर ११.६० हेक्टर जमीन खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. वनजमीन अधिग्रहण करण्याकरिता १८६.४० लाख रूपये खर्च येणार असून खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करण्याकरिता २३२ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.
तसेच संदेश बोर्डासाठी १९१.५२ लाखाचा खर्च येणार आहे. रस्त्याचे बांधकाम, सीडीवर्क, छोटे पूल, रस्ता दुभाजक, फुटपाथ याकरीता ८५१२.०० लाख रूपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने नमूद केले आहे. तर बायपास मार्गाचे बांधकाम झाल्यानंतर विकासासाठी ४०० लाख रूपयाचा खर्च येणार आहे. एवढा निधी यापूर्वीच्या आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला नाही. मागील अनेक वर्षांपासून बायपास रस्त्याच्या निर्मितीची नागरिकांना प्रतीक्षा आहे. सदर बायपास रस्त्यासाठी निधीकरिता राज्य सरकारने १७०० कोटी रूपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले आहेत व त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. त्याचवेळी गडचिरोलीसह देसाईगंजच्या बायपास रस्त्याचेही काम यासोबतच केले जाईल, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)