गडचिरोली जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 13:10 IST2019-11-01T13:09:56+5:302019-11-01T13:10:38+5:30
परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील कोरची पंचक्रोशीला जबरदस्त फटका बसला असून उभी पिके आडवी झाली आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील कोरची पंचक्रोशीला जबरदस्त फटका बसला असून उभी पिके आडवी झाली आहेत. कोडगुल, मसेली, बेथकाठी,बेडगाव ठिकठिकाणी शेतीची पावसामुळे दैनाच झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पेरणीसाठी उसनवारी करून घेतलेल्या बी बियाण्यांचे पैसेही या परतीच्या पावसामुळे निघणे मुश्किल झाले.
शिव छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफ योजनेत सहभागी होण्यासाठी तालुक्यातील शेतकरी अर्ज दाखल केला पण शासनाच्या जाचक अटीमुळे लाभ न मिळाल्याने वंचित असताना ग्रामीण भागात मात्र शेतकऱ्यांच्या दारावर या वर्षी कर्जाचे कंदील लागणार आहेत. मसेली, कोटरा, बोटेकसा, भीमपूर , बेलगाव , बोरी , बेतकाठी कोडगुल कोरची तालुक्यातील मुख्य भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातशेती हे अनेकांचे उत्पन्नाचे साधन असल्याने बळीराजा दरवर्षी भातपीक घेतो. यावर्षी भातशेती चांगली जोमाने आली होती, मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून विजांच्या कडकडाटसह परतीच्या पावसाने कोरची पंचक्रोशीत थैमान घातल्याने भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून उभी पीके आडवी झाली आहेत. त्यामुळे भाताच्या लोंबाना मोड येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे शेतात पाहणी केली असता दिसू लागले आहेत.
आता भात शेतीच उदध्वस्त झाल्याने कर्जाचे पैसे फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. असे असले तरी सरकारी अधिकारी पंचनामे करण्यासाठी चालढकल किंवा दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.