फळ शेतीला मिळाले बळ
By Admin | Updated: June 23, 2014 00:03 IST2014-06-23T00:03:05+5:302014-06-23T00:03:05+5:30
एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा

फळ शेतीला मिळाले बळ
गडचिरोली : एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना धान पिकाबरोबरच फळवर्गीय झाडांची लागवड करून फळ शेती करण्यास प्रोत्साहन करीत आहेत. आवश्यक असलेले रोपटे रोपवाटिकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.ृ
जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन बाराही तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकासाठी अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. जिल्ह्यात चामोर्शी येथील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा जलसिंचन प्रकल्प नसल्याने दरवर्षीच एका पाण्याने पीक करपते. याचा अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असला तरी नाईलाजास्तव धान पिकाचेच उत्पादन घेतले जात होते. दरवर्षी होणाऱ्या तोट्यामुळे येथील शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे.
पारंपरिक धान पिकाच्या उत्पादनापेक्षा फळ पिकांची शेती लाभादायक ठरू शकते. महत्वाचे म्हणजे फळ पिकांच्या रोपट्यांची लागवड दरवर्षी करावी लागत नाही. त्यामुळे खर्च बराच कमी लागतो. संकरीत फळांच्या झाडांना दोन ते तीनच वर्षात फळ लागत असल्याने उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान पिकाच्या शेतीपेक्षा फळ पिकाची शेती करावी, यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. आजची नवीन पिढी शेती करीत आहे.
जिल्ह्यात रामगड, वाकडी, कृष्णनगर, सोनापूर, कसनसूर या पाच ठिकाणी शासकीय फळ रोपवाटीका आहेत. या फळरोपवाटीकांमध्ये आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सिताफळ, फणस, गिरीपुष्प, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद, जांभुळ या फळ झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात येत आहे. या पाचही फळ रोपवाटीकांमध्ये दरवर्षी लाखो रोपटे लावली जात आहेत. ही रोपटे अत्यंत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. रामगड येथील रोपवाटिकेत वरील फळझाडांची सुमारे ५१ हजार ५१३? वाकडी येथे २४ हजार ५८३, कृष्णनगर २८ हजार ३१, सोनापूर १३ हजार ७५ व कसनसूर येथे ७ हजार ३६२ रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. ही रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)