पाच हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए, बँकांनी कर्ज नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:24 IST2025-07-28T19:23:49+5:302025-07-28T19:24:20+5:30
Gadchiroli : कर्जासाठी सावकाराकडे धावाधाव, उत्पादन न झाल्याने वाढली अडचण

Five thousand farmers' accounts are NPA, banks deny loans
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुसरे कर्ज घ्यायचे असेल तर पहिल्या कर्जाची परतफेड करावी लागते. हा बँकांचा नियम आहे; मात्र मागील वर्षी कर्ज घेतलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. त्यामुळे त्यांना यावर्षीच्या हंगामात कर्ज मिळाले नाही. उलट या शेतकऱ्यांना व्याज भरून द्यावे लागणार आहे.
शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. काही जुजबी कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाते; मात्र दरवर्षी कर्ज मिळण्यासाठी त्याचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करून नवीन हंगामासाठी जूनमध्येच कर्ज उचलले आहे; मात्र १० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यांना यावर्षीचे कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे अडचण वाढली आहे.
२५४ कोटींचे कर्ज वितरित
मागील वर्षी सुमारे ३७ हजार २१७शेतकऱ्यांना २५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही.
मुदत कधीपर्यंत ?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यांना ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा लागतो. त्यानंतर काही दिवसातच दुसऱ्या हंगामाचे कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरायची असते.
कर्जमाफीचा भ्रम
शासनाकडून पीक कर्ज माफ केले जाते, असा भ्रम काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे हे शेतकरी ऐपत असूनही जाणूनबुजून कर्ज भरत नाही. परिणामी त्यांना दुसऱ्या वर्षी कर्ज मिळत नाही. बँकेकडून कर्ज न मिळाल्याने पुन्हा सावकाराच्या दारात शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे. अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे.
शेती ही निसर्गावर अवलंबून आहे.
"प्रत्येक वर्षी उत्पादन होईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने ५० टक्के जरी कर्ज भरले तरी त्याला नवीन कर्ज उपलब्ध करावे. उर्वरित ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्यावा. त्याचे टप्पे पाडावे."
- आसाराम कुंरजेकर, शेतकरी, खरकाळा