पारंपरिक शेतीला फाटा देत पिकवले सुर्यफूल, नवरगावच्या शेतक-यांचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 20:02 IST2018-04-10T20:02:36+5:302018-04-10T20:02:36+5:30
सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही.

पारंपरिक शेतीला फाटा देत पिकवले सुर्यफूल, नवरगावच्या शेतक-यांचा प्रयोग
गडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्या (आत्मा) मार्गदर्शनातून काही शेतक-यांना हिंमत मिळाली आणि त्यांच्या शेतात आता सुर्यफुलाचे पीक डोलू लागले आहे.
कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील ११ शेतक-यांनी शेतकरी पुरूष बचत गटाची स्थापना करून ११ एकरात सुर्यफुलाची लागवड केली. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी त्या शेतक-यांना नगदी पिकांकडे वळण्याचा सल्ला देत कोणकोणती पिके ते घेऊ शकतात यासंदर्भात मार्गदर्शन केले. नगदी पिकांमुळे कमी-जास्त पाऊस किंवा कीडीच्या प्रादुर्भावामुळे घटणारे पिकांचे उत्पादन, महागडे बियाणे, कीटकनाशकासाठीवारंवार करावा लागणारा खर्च हे काही प्रमाणात नियंत्रणात येईल, ही बाब शेतक-यांच्या गळी उतरविली. त्यामुळे शेतकरीही वेगळा प्रयोग करण्यासाठी तयार झाले. यातून जानेवारी २०१८ मध्ये सुर्यफुलाची लागवड केली आणि आता हे पीक चांगलेच बहरले आहे.
शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष उदाराम कवाडकर यांनी सांगितले की, सुर्यफुलाच्या लागवडीसाठी एकरी ७ हजार रुपयांचा खर्च आला. एकूण जवळपास ८० हजारांचा खर्च आला. त्यातून १०० क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मधमाशी पालनही सोबतच सुरू
सूर्यफुलाच्या शेतीसोबतच मधमाशी पालन व्यवसायाचे तंत्रही शेतक-यांना दिले आहे. त्यामुळे या शेतक-यांच्या उत्पादनात भर पडणार आहे. कमी लागवड खर्चात जास्त उत्पादन देणा-या या पिकातून इतर शेतक-यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केला.