पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By Admin | Updated: June 21, 2014 23:58 IST2014-06-21T23:58:19+5:302014-06-21T23:58:19+5:30

जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही दमदार पावसाने अजूनपर्यंत बऱ्याच भागात हजेरी लावली नसल्याने पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट होण्याची

Due to the delay in the monsoon, concerns of farmers increased | पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

पावसाला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

गडचिरोली : जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही दमदार पावसाने अजूनपर्यंत बऱ्याच भागात हजेरी लावली नसल्याने पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात जून महिन्याच्या अगदी सुरूवातीलाच मान्सून दाखल होतो. विदर्भात मात्र मान्सून दाखल होण्यास जूनचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा लागतो. जवळपास दुसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरूवात होत असल्याने शेतकरीवर्ग विविध पिकांची पेरणी करतात. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन, तूर, कपासी यासारख्या पिकांचेही बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते. या सर्व पिकांची पेरणी करण्यासाठी मोठा पाऊस होऊन तण उगवणे आवश्यक आहे. तण उगविल्यानंतर पेरणी केल्यास तण नष्ट होत असल्याने बियाणांची उगवण क्षमता वाढून तण काढण्याचा खर्चही कमी होतो. त्याचबरोबर उत्पादनातही चांगली वाढ होते.
पहिला पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीच्या कामांना सुरूवात होते. यावर्षी मात्र १७ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास पडलेला पाऊस वगळता एकही दिवस मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावाही नाही. तण उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी बियाणांच्या पेरणीला अजूनपर्यंत सुरूवात केली नाही.
धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची आवश्यकता भासते. त्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. यावर्षी पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याची प्रचिती आता यायला लागली आहे. अजूनपर्यंत मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. उशीरा पाऊस आल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्त राहते. मागील वर्षी मुसळधार पावसाने अनेकांच्या शेतात व घरात पाणी शिरले होते. हजारो हेक्टर शेतीतील पीक वाहून गेले होते. मागील वर्षीचे कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर असतांना यावर्षीही पाऊस दगा देण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Due to the delay in the monsoon, concerns of farmers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.