पावसाअभावी धान रोवणीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:41 IST2018-08-01T01:40:03+5:302018-08-01T01:41:34+5:30

मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Due to the absence of rain, the works of Paddy Roping | पावसाअभावी धान रोवणीची कामे ठप्प

पावसाअभावी धान रोवणीची कामे ठप्प

ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाने घेतली उसंत : चामोर्शी तालुक्यात ७० टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पुणर्वसू नक्षत्रातील पावसामुळे धान रोवणीच्या कामांना वेग आला होता. त्यानंतर पाऊस पडत होता. मात्र पावसाची केवळ रिपझिप सुरू होती. मोठा पाऊस झाला नाही. सखल भागातील बांध्यांमध्ये पाणी जमा झाले. शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर मात्र आता पावसाने मागील आठ दिवसांपासून दडी मारली आहे. बांध्यांमधील पाणी आटल्याने रोवणीची कामे थांबली आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरीच रोवणीची कामे करीत आहेत.
रोवणी करायच्या बांधित पाणी आहे. मात्र पऱ्याला पाणी नाही, असे शेतकरी सुखा परा खोदत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी शेतात इंजिन लावून पाणी देत आहेत. अजूनपर्यंत रोवणीची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ ७० टक्के रोवणी आटोपली आहेत. तलाव, बोड्या अर्धवट भरून आहेत. अश्लेषा नक्षत्राला ३ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. या नक्षत्रात पाऊस झाल्यास उर्वरित रोवणीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. धानपिकाला शेवटपर्यंत पाणी द्यावे लागत असल्याने धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव, बोड्या भरणे आवश्यक आहे. अन्यथा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडा
चामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतीला रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी उपलब्ध होते. जवळपास ४० किमी अंतरापर्यंतची शेती सिंचित होते. पावसाने उसंत घेतल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत. परिणामी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. सिंचन विभागाने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सिंचन क्षेत्राचा विस्तार मोठा असल्याने तलावातून पाणी सोडल्यानंतर शेवटच्या शेतकऱ्यांला पाणी उपलब्ध होण्यास आठ पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी लागतो. कन्नमवार जलाशय ६० टक्केपेक्षा अधिक भरले आहे. पावसाळा अजून शिल्लक आहे. या कालावधीत पाऊस होऊन तलाव पूर्णपणे भरेल. रोवणीसाठी पाणी आवश्यक असल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. याबाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सिंचन विभागाकडे याबाबत मागणी सुध्दा केली आहे.

Web Title: Due to the absence of rain, the works of Paddy Roping