भोजनाअभावी वसतिगृह बंद
By Admin | Updated: July 14, 2014 23:57 IST2014-07-14T23:57:38+5:302014-07-14T23:57:38+5:30
शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी समाजकल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने सदर

भोजनाअभावी वसतिगृह बंद
ई-निविदेने केला घोळ : समाजकल्याण कार्यालयावर विद्यार्थी धडकले
गडचिरोली : शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी समाजकल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने सदर वसतिगृह बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण होत आहे. राज्य शासनाच्या ई-टेंडरिंगमुळे ही अडचण निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना आणखी १० दिवस भोजनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
समाजकल्याण विभागाच्या मार्फतीने जिल्ह्यात ६ वसतिगृह चालविले जात आहेत. त्यापैकी ४ वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी १०० आहे. तर २ वसतिगृहाची प्रवेशक्षमता प्रत्येकी ७५ एवढी आहे. या ६ वसतिगृहामध्ये एकूण ५५० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यापैकी गडचिरोली येथे ३, आरमोरी, चामोर्शी व अहेरी येथे प्रत्येकी १ वसतिगृह आहे. यापूर्वी या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक समाजकल्याण अधिकाऱ्याच्या मार्फतीने केली जात होती. २०१२-१३ मध्ये कंत्राटदाराची नेमणूक निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली होती. हा कंत्राटदार २०१३-१४ या आर्थिक वर्षातही मागील वर्षीच्याच दरात विद्यार्थ्यांना भोजन उपलब्ध करून देत होता. वाढती महागाई लक्षात घेऊन भोजनाचे दर २० टक्के वाढून देण्यात यावे, अशी मागणी कंत्राटदाराने केली होती. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र शासनाने सदर प्रस्ताव नामंजूर केला. यावर्षी पहिल्यांदाच राज्यभरातील वसतिगृहांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही प्रक्रिया नुकतीच पार पडली असून गोंदिया येथील एका कंत्राटदाराला भोजन पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष भोजन उपलब्ध होण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागणार आहेत.
समाजकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये आठवी ते महाविद्यालयीन वर्गाचे विद्यार्थी राहतात. शाळा सुरू झाल्याबरोबरच हे विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी आले. मात्र भोजनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना राहण्यास समाजकल्याण विभागाच्या प्रशासनाने मनाई केली आहे. काही दिवसातच भोजनाची व्यवस्था होईल, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आठ दिवस नातेवाईकांकडे राहून शाळेत उपस्थिती दर्शविली. मात्र १५ दिवसाचा कालावधी लोटूनही वसतिगृह उघडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने १० ते १५ विद्यार्थ्यांनी थेट समाजकल्याण कार्यालय गाठून विशेष समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेतली. समाजकल्याण आयुक्त टी. डी. बरगे यांनी ई-टेंडरिंगमध्ये उशीर झाला असल्याने भोजन उपलब्ध होण्यास आणखी ८ ते १० दिवसाचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपण बाहेर जेवण करू मात्र वसतिगृहात राहू द्यावे, अशी विनंती केली. मात्र जोपर्यंत भोजनाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत राहू देणार नाही, अशी ताठर भूमिका समाजकल्याण आयुक्तांनी घेतली आहे. (नगर प्रतिनिधी)