रेल्वेमुळे उघडणार विकासाचे दालन
By Admin | Updated: May 10, 2017 01:36 IST2017-05-10T01:36:14+5:302017-05-10T01:36:14+5:30
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमिपूजन नागपूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी आॅनलाईन करण्यात आले.

रेल्वेमुळे उघडणार विकासाचे दालन
गडचिरोली-वडसा मार्ग : नागरिकांची होणार सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमिपूजन नागपूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी आॅनलाईन करण्यात आले. लवकरच या मार्गाच्या निर्मितीला सुरूवात होणार आहे. गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय प्रथमच रेल्वेमार्गावर येणार असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे दालन उघडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती व खनिजसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रेल्वेमार्ग नसल्याने या सर्व खनिज संपत्तीच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे मार्ग नसल्याने उद्योजक उद्योग स्थापन करण्यासाठी तयार होत नव्हते. रेल्वे मार्ग निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटून विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर येथे पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासह इतरही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. रेल्वे मार्ग निर्मितीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले आहे."