लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे
By Admin | Updated: June 23, 2014 00:04 IST2014-06-23T00:04:24+5:302014-06-23T00:04:24+5:30
शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये यासाठी आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आमदार डॉ. नामदेव उसेंडी

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे
आरमोरी : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये यासाठी आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या घरासमोर २२ जून रोजी धरणे आंदोलन केले.
शालेय पोषण आहार शिजविण्याची योजना सुरू केल्यापासून अत्यंत कमी मोबदला मिळत असतानाही गावातील काही महिला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देत होत्या. पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधेच्या घटना घडल्यानंतर या घटनांसाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या संघटनांनी शालेय पोषण आहाराची जबाबदारी घेण्यास नकार दिला. २६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. आहार शिजविण्याची व पुरवठा करण्याची जबाबदारी बचत गटांना देण्यात येणार आहे.
अत्यंत कमी मोबदला असतांना ज्यावेळी आहार शिजविण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. अशा परिस्थितही या महिलांनी आहार शिजविला आहे. ९० टक्के महिला निराधार, विधवा, परितक्त्या व बीपीएल कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर फार मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे त्यांना पुर्ववत कामावर घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, तालुका सचिव कुंदा चल्लीलवार, सारिका वांढरे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, विलास बन्सोड, संगीता सोनटक्के, रेमाजी उरकुडे, पौर्णिमा मालाकार, भिमन्ना तालावार, जुबेदा शेख, पुष्पा मडावी यांनी केले. आंदोलनात जिल्ह्यातील पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)