सीआरपीएफने खोदला तलाव
By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-07-01T01:29:51+5:302014-07-01T01:29:51+5:30
शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे

सीआरपीएफने खोदला तलाव
शेतकऱ्यांसाठी सिंचन : कोटगुल येथील तलावाचे खोेलीकरण
देसाईगंज : शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे.
नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा आर्थिक विकास केल्याशिवाय नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करणे अशक्य आहे. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर केंद्रशासन, राज्यशासन नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष योजना राबवित आहे. विशेषकरून आर्थिक व शैक्षणिकस्तर उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नक्षल्यांचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफच्या बटालियन तैनात आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाची १९१ क्रमांकाची बटालियन नक्षल्यांसोबत सामना करत असतांनाच लोकोपयोगी विविध उपक्रम राबवित आहे. कोरची तालुक्यातील नागरिकांची व जनावरांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन गाव तलावाचे खोलीकरण करण्याचे काम सीआरपीएफने हाती घेतले. यासाठी कोटगुलच्या सरपंच पुष्पा कोडाप, उपसरपंच जुल्फीकार, खेतानी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेश नैताम, रामदास हारामी, डॉ. हरीष टेकाम, डॉ. बिश्वास, संजय गोवर्धन आदींनी सहकार्य केले.
तलावाच्या खोलीकरणाचे काम १९१ तुकडीचे उपकमांडर करतार सिंह, सहाय्यक कमांडर नरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना करतार सिंह म्हणाले की, पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. पाण्याचा अपव्यय झाल्यास भविष्यात फार मोठी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी जंगलतोड थांबवून वृक्षांचे संगोपन करावे, असे प्रतिपादन केले.
यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी एच. के. घाडगे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)