Coronavirus : कोरोनाला दैवी प्रकोप समजून ग्रामस्थांचे देवीला साकडे, गाऱ्हाण्यासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 07:46 PM2021-05-06T19:46:01+5:302021-05-06T19:56:46+5:30
Coronavirus in Maharashtra : सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले.
गडचिरोली - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आणि गावात तापाची साथ सुरू असताना गावकऱ्यांनी देवीला साकडे घालत आरोग्य विभागाच्या तपासणीला नकार दिला. गावकऱ्यांच्या या अनोख्या (अंध)श्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. हा प्रकार चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर या गावात घडला. (Request to the Goddess in Jairampur to avoid the crisis of Corona, crowd of devotees; Villagers refuse health department inspection)
सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले. या परिसरातील गावखेड्यात संकटकाळात माउलीला (देवी) पाणी घालण्याची प्रथा आहे.
त्यानुसार गावातील महिलांनी नदीवरून कळशीत पाणी भरून वाजतगाजत नेऊन माउलीला अर्पण केले. दोन किंवा पाच दिवस माउलीला पाणी अर्पण केले म्हणजे ताप हा जातो अशी लोकांची समजूत आहे. गावात काही सुशिक्षित नागरिक असले तरी पूर्वीपासून चालत असलेली प्रथा असल्याने कुणीही गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत नाही. जैरामपूरसह गोंडपिपरी परिसरातही हा प्रकार चालत असल्याची माहिती आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण अनेक गावात पसरले आहेत. तरीही हा ताप कोरोनाचा नाही अशी गावकऱ्यांची समजूत आहे. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर यांनी सांगितले.
आरोग्य विभागाची चमू गावात
जैरामपूर गावात तापाची साथ पसरल्यानंतर २७ एप्रिलला आरोग्य कर्मचाऱ्यांनी (आशा) गावात सर्वेक्षण केले. दि. २९ ला ५० लोकांची कोरोना तपासणी केली, त्यात २० जण पॉझिटिव्ह आले. त्यांना शाळेत ठेवून उपचार करण्याची तयार असताना गावकरी ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरातच (गृह विलगीकरणात) ठेवण्यात आले. ३ मे रोजी ४० लोकांची लसीकरण केले. गुरुवारी (दि. ६) गावात पुन्हा कोरोना तपासणीसाठी कॅम्प लावला, पण कोणीही तपासणीसाठी आले नाही. ग्रामस्तरीय समिती, कोनसरी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी वारंवार उद्बोधन करूनही गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.