चारित्र्य घडविणारे साहित्य जगात केवळ भारतातच
By Admin | Updated: December 3, 2015 01:39 IST2015-12-03T01:39:01+5:302015-12-03T01:39:01+5:30
जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय, हिंमत व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची गरज आहे. त्याचप्रमाणे चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी साहित्याची गरज आहे.

चारित्र्य घडविणारे साहित्य जगात केवळ भारतातच
नामदेव कल्याणकर यांचे प्रतिपादन : नैतिक जीवनावर पुस्तकाचे वितरण
गडचिरोली : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय, हिंमत व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची गरज आहे. त्याचप्रमाणे चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी साहित्याची गरज आहे. चारित्र्य घडविणारे साहित्य संपूर्ण जगात केवळ भारतातच आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबईद्वारा प्रकाशित नैतिक जीवनावर आधारित पुस्तक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सुधीर भातकुलकर, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे प्रमुख प्रकाश पुसदकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांमुळे समाजाला दिशा मिळते. समाजाच्या उन्नतीसाठी संस्कृती संवर्धनासारखे कार्यक्रम राबवून अरविंद पोरेड्डीवार यांनी समाजाप्रती असलेल्या आपुलकीचे दर्शन घडविले आहे. अशा व्यक्तींमुळे समाजात चारित्र्यवान लोकांची निर्माण झालेली पोकळी नक्कीच भरून निघेल, तसेच भावी पिढी घडविण्याचे काम नैतिक जीवनावर आधारित पुस्तकाचे वाचन करून त्यातील काही बाबी आचरणात आणल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होईल, असा आशावाद कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केला.
अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील जनतेने चांगल्या प्रकारे संस्कृतीचे जतन केले आहे. आज बालवयात आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केल ेतर येणारी नवीन भावी पिढी चांगल्या विचाराची राहणार आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमार्फत नैतिक जीवनावर आधारित परीक्षेचे आयोजन केल्यास संस्कारक्षम पिढी तयार होईल, असे पोरेड्डीवार यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची कमी नाही आणि त्यांची घोडदौड कुणीही रोखू शकणार नाही. जीवनात मेहनतीमध्ये सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते, असे प्रंचित पोरेड्डीवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)