जिल्हाभरात आजपर्यंत सरासरी १०५ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:34 IST2018-09-06T23:34:02+5:302018-09-06T23:34:33+5:30
जिल्हाभरात ६ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या १०५.४ टक्के पाऊस झाला आहे. तसेच वार्षिक सरासरीच्या ९१.९ टक्के पाऊस पडला आहे. पावसाचा जोर सुरूच असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हाभरात आजपर्यंत सरासरी १०५ टक्के पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरात ६ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या १०५.४ टक्के पाऊस झाला आहे. तसेच वार्षिक सरासरीच्या ९१.९ टक्के पाऊस पडला आहे. पावसाचा जोर सुरूच असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी अगदी सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावली. एकदोन दिवसांचा खंड पडल्यानंतर दर दिवशी पाऊस कोसळत आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते, असा दर वर्षीचा अनुभव आहे. या महिन्यात दिवसा कडक ऊन पडते. त्यामुळे दमट वातावरण निर्माण होते. मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडत असून वातावरणात गारवा कायम आहे.
चार दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १३५४ मिमी पाऊस पडतो. यावर्षी मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत १२४५ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला आहे. केवळ ९ टक्के पाऊस शिल्लक आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पावसाचा जोर पुन्हा काही दिवस शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, कापूस या पिकांना तर चांगलाच फटका बसला आहे. धानपिकावरही वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. विविध प्रकारचे कीटकनाशके फवारल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. फवारण्यांमुळे उत्पादन खर्च वाढत आहे.
मुलचेरा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के, अहेरी तालुक्यात १२० टक्के, सिरोंचा तालुक्यात १३४ टक्के तर भामरागड तालुक्यात १२२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये ७० टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. ६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १०८०.८ मिमी पाऊस पडतो. यावर्षी १२४५ मिमी पाऊस झाला आहे.