विसोरा परिसरात आम्लवर्षा
By Admin | Updated: July 5, 2014 23:34 IST2014-07-05T23:34:46+5:302014-07-05T23:34:46+5:30
आज सकाळच्या सुमारास विसोरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या़ या पावसामुळे या भागातील झाडांच्या पानांवर मळकट रंगाचे डाग तयार झाल्याने सदर पाऊस आम्लयुक्त

विसोरा परिसरात आम्लवर्षा
नागरिकांमध्ये भीती : झाडांच्या पानावर मळकट रंगाचे डाग झाले तयार
विसोरा : आज सकाळच्या सुमारास विसोरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या़ या पावसामुळे या भागातील झाडांच्या पानांवर मळकट रंगाचे डाग तयार झाल्याने सदर पाऊस आम्लयुक्त असल्याची भिती व्यक्त होत आहे़
शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा, शंकरपूर परिसरात पडलेल्या पावसाने झाडांच्या पानांवर मळकट रंगाचे डाग तयार झाल्याने व हे डाग दिवसभर कायम राहिल्याने हा पाऊस आम्लयुक्तच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी सन २००८ च्या जुलै महिन्यात सुध्दा या परिसरात आम्लवर्षा झाली होती हे विशेष!
स्वयंचलित वाहने, शेतभट्टया, वीजप्रकल्प व जीवाश्म इंधनाचे ज्वलन यामधून निघणाऱ्या धुरात नायट्रोजन, कार्बनडायआॅक्साईड, सल्फर आदी रासायनिक पदार्थ असतात़ हे पदार्थ सुक्ष्म कणांच्या रूपात वातावरणात मिसळतात़ सल्फर आणि नायट्रोजन आक्साईड हे पाण्यात विरघळत असल्यामुळे ते बाष्पांच्या संपर्कात आल्यावर लगेच आम्ल तयार होते आणि ते आम्ल पर्जन्याच्या स्वरूपात जमिनीवर पडते़ आम्लयुक्त पाण्यातील हानिकारक क्षार व विरघळलेले जमिनीवरील इतर पदार्थ यामुळे माणसाला अस्थमा, चक्कर येणे, पोटाच्या तक्रारी, अल्सर, डोक्याची जळजळ, थकवा, अंगदुखी, निरूत्साह आदी रोग प्रामुख्याने जाणवतात़ आम्ल पर्जन्यात सहजपणे विरघळणाऱ्या अॅल्युमिनीयम या धातुमुळे अल्झायमर नावाचा धोकादायक रोग मानवास होण्याची शक्यता असते. जमिनीवरील पोषक द्रव्य नष्ट होतात़ त्यामुळे वनस्पतींना ती शोषता न आल्याने त्यांची वाढ खुंटते व उत्पादनावर परिणाम होतो, तसेच जमिनीवरील उपयुक्त सुक्ष्मजीवांचा नाश होतो़ (वार्ताहर)