१ जूनपासून गडचिरोली जिल्ह्यातील चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:30 IST2025-05-30T16:29:52+5:302025-05-30T16:30:39+5:30
Gadchiroli : गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०२४ पासून हे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते.

38 gates of Chichdoh Barrage in Gadchiroli district to be opened in phases from June 1
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे येत्या १ जूनपासून पाण्याच्या येवानुसार टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सून सुरू झाल्याने आणि पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. बॅरेजमध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
वाढत्या पाणीपातळीमुळे कोणतीही जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीलगतच्या सर्व गावांना आणि ग्रामपंचायतींना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील गावांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन आहे.
बॅरेजमधून ८८.०४ क्यूमेक्स विसर्ग होणार
सद्यस्थितीत, २७ मे रोजी चिचडोह बॅरेजमधील पाणी पातळी १८३.०० मीटर असून, जिवंत साठा ५३.५२ दशलक्ष घनमीटर आहे. या नियोजनानुसार, दि. १ जून रोजी सकाळी ८ वाजता प्रकल्पाच्या उभ्या उचल द्वारातून ८८.०४ क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या खालील भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात बंद केले होते दरवाजे
चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले असून, त्याची एकूण लांबी ६९१ मीटर आहे. यामध्ये १५ मीटर लांब आणि ९ मीटर उंचीचे असे एकूण ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. सदर दरवाजे उघडले जाणार आहे.