आरटीई प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून?; यंदा नियमात केला महत्त्वाचा बदल, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 07:23 IST2026-02-13T07:22:36+5:302026-02-13T07:23:22+5:30
‘लोकमत’ने या संदर्भात ८ फेब्रुवारीला वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर गुरुवारी शासनाने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला शासकीय आदेशाद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली.

आरटीई प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून?; यंदा नियमात केला महत्त्वाचा बदल, जाणून घ्या
मुंबई - अखेर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण संचालकांना गुरुवारी निर्णयाद्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता दिली असली तरी त्यात तारखेचा उल्लेख मात्र केलेला नाही. शासनाच्या आदेशानुसार यंदा प्रती विद्यार्थी १७,६७० रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पालकांना अर्ज करताना एक किलोमीटरच्या पलीकडील शाळा निवडता येणार नाही, अशी तरतूद प्रणालीमध्ये केली आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतराच्या मर्यादेतच ‘गुगल लँडमार्क’वर दर्शवल्यानुसार अर्ज भरता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला दोन महिने विलंब झाला आहे. या संदर्भात सामाजिक संघटना आणि पालकांनी विचारणा केली होती. ‘लोकमत’ने या संदर्भात ८ फेब्रुवारीला वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर गुरुवारी शासनाने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला शासकीय आदेशाद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली.
शासनाकडे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विनंती प्रस्ताव पाठवला होता. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. १७ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते.
शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचलनालय
... तर शाळांना दंड
विनाकारण प्रवेश नाकारल्यास शाळा प्रवेश नाकारतात ही पालकांची तक्रार योग्य असल्यास प्रवेश प्रक्रियेत शाळा दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे.