पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:09 IST2025-06-19T15:08:51+5:302025-06-19T15:09:44+5:30

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे.

Education experts in the state have strongly criticized the acceptance of textbooks 'as is'. | पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका 

पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे. मात्र, राज्यात विविध  भाषा आणि विषयांतील शेकडो तज्ज्ञ संशोधक असताना एनसीईआरटीच्या पुस्तकांचे भाषांतर करण्याची गरज नाही, असे म्हणत या भूमिकेवर राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, मराठीप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी टीका केली आहे. शालेय विद्यार्थ्यांची नीट, जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुलभ व्हावी, यासाठी हे धोरण असल्याचे पत्रात म्हटले आहे. 

बौद्धिक दिवाळखोरी !
राज्यातील स्थानिक गरजा, भाषा, सांस्कृतिक विविधता आणि शैक्षणिक पारंपरिक अभ्यास लक्षात न घेता दिल्लीतून थेट पुस्तके स्वीकारणे, त्या पुस्तकांची केवळ भाषांतरे करणे म्हणजे ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘दुय्यम ठरवण्याचा प्रकार’
मराठीशिवाय अन्य माध्यमांसाठी एनसीईआरटी किंवा सीबीएससीईच्या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करून ती स्वीकारण्यात यावी. हे काम बालभारती मंडळाने करावे. राज्यातील शिक्षण वर्तुळातील जाणकारांनी या मुद्द्यालादेखील आक्षेप घेत वैचारिक दारिद्र्याचे हे लक्षण असल्याची बोचरी टीका केली. हे धोरण राज्यातील अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञांना दुय्यम ठरविण्यासारखे आहे, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बालभारती फक्त एनसीईआरटीच्या पुस्तकांचे ‘जसेच्या तसे’ अनुवाद करणारी सहायक कारकुनी संस्था करायची आहे का? आजवर गणित, विज्ञानाची पुस्तके महाराष्ट्रातील तज्ज्ञ, अभ्यासकच करत आले आहेत. आजच ते अपात्र झाले का? असा प्रश्न साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.

मागील सुकाणू समितीच्या बैठकीत एनसीईआरटीच्या विज्ञान व गणिताच्या अभ्यासक्रमातून आवश्यक तो सर्व भाग घ्यावा. त्यानुसार राज्यातील पाठ्यपुस्तके तयारी करावीत, असे ठरले होते. आताच्या जीआरमध्येही तसेच म्हटलेले असून, केवळ ‘जशी आहेत तशी’ असा शब्द प्रयोग आल्याने गोंधळ झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्य शालेय शिक्षण सुकाणू समितीचे मिलिंद नाईक यांनी दिली.

राज्यात पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके तयार करणारे संशोधक, तज्ज्ञ मंडळींसह सक्षम यंत्रणाही राज्यात आहे. दिल्लीच्या एनसीईआरटीच्या ओंजळीने पाणी पिण्याची गरज नाही. अन्यथा हे तर दिवाळखोरीचे लक्षण म्हणावे लागेल, असे महाराष्ट्र शिक्षक सेनेचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर म्हणाले.

Web Title: Education experts in the state have strongly criticized the acceptance of textbooks 'as is'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.