विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:31 IST2025-06-16T09:29:04+5:302025-06-16T09:31:08+5:30

विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का?

Why is India so backward in air safety? | विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अनेक शुभचिंतक आणि मित्रांनी माझ्याशी सहज गप्पा करण्याचे निमित्त करून मला आडूनआडून सुचविले, की तुम्ही खूपच जास्त विमान प्रवास करता, काळजी घ्या ! कुणी सरळसरळ काही म्हटले नाही, पण त्यांची चिंता, कळकळ मला जाणवली.. ‘ही एक दुर्घटना आहे’ असे मी त्यांना समजावत राहिलो. प्रत्यक्षात आजही विमान प्रवास हा सर्वांत सुरक्षित प्रवास आहे. जागतिक पातळीवर विमान अपघातात मृत्यू पावण्याची शक्यता  १ कोटी १० लाखांत केवळ एक इतकी असते. या तुलनेत रस्ता दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र कितीतरी अधिक असते.  

भारतामध्ये रस्ता दुर्घटनेत गतवर्षी १ लाख ८० हजार  लोकांचा मृत्यू झाला. भारतात रेल्वे प्रवासातही दरवर्षी सरासरी २० हजार लोक मृत्युमुखी पडतात. हे आकडे पाहिले तर विमान प्रवास नक्कीच सुरक्षित वाटतो. तरीही काही प्रश्न उरतातच. अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेनंतर ते अधिक तीव्र झाले आहेत. विमान प्रवाशांची आकडेवारी पाहता सर्वाधिक विमान प्रवास अमेरिकन लोक करतात. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून, तिसऱ्या क्रमांकावर भारत दिसतो. मार्च २०२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या १६ कोटी ५४ लाखांपर्यंत पोहोचली होती. २०२३-२४च्या तुलनेत हा आकडा ७.६ टक्के जास्त आहे. इथून पुढे दरवर्षी ही संख्या वाढत जाणार; कारण बहुतेक सगळ्या छोट्या शहरांमध्ये विमानतळ आणि विमानसेवाही सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. तरीही विमान प्रवासातील सुरक्षेच्या बाबतीत भारत अजूनही इतका मागे का? - आपण याबाबतीत ४८व्या क्रमांकावर आहोत. 

२०१८ मध्ये आपण १०२ व्या क्रमांकावर होतो आणि २०२२  साली अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर आलो. पण आपण विमान प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत इतके पुढे आहोत तर सुरक्षेच्या बाबतीतही आपण काळजी घेतली पाहिजे. खूप जुने नियम भारत सरकारने २०२४  साली बदलले.  त्यामुळे पुष्कळ फरक पडण्याची शक्यता आहे. परंतु छोट्या छोट्या गोष्टी मोठमोठ्या शंकांना जन्म देतात.  नागपुर विमानतळाचेच उदाहरण घ्या. छतावर लावलेल्या आवरणाचा एक तुकडा अचानक एके दिवशी कोसळला. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. परंतु काही प्रवाशांना जखमा झाल्या. हवाई वाहतुकीत प्रत्येक बाबतीत संपूर्णपणे खबरदारी घेण्याचे  धोरण असते. असे असताना हा तुकडा कसा पडला? -कारण बांधकामात गडबड ! अशा प्रकारच्या इतरही अनेक घटना आहेत.

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान का कोसळले त्याची कारणे अजून समोर यावयाची आहेत. परंतु त्याच दिवशी त्याच विमानातून दिल्लीहून अहमदाबादकडे आलेल्या एका प्रवाशाने प्रसारित केलेला  व्हिडिओ  भयानक होता. व्हिडिओत असे दिसते, की विमानातील कुठलेच बटन काम करत नव्हते. वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने प्रवासी वैतागले होते. अहमदाबादेत पोहोचल्यानंतर त्या विमानाची तपासणी केली गेली का?  एखादे विमान दुर्घटनाग्रस्त होते त्याचा अर्थ स्पष्ट आहे,  कोठे ना कोठे चूक झाली असणारच ! हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातल्या चुकांची मोठी उदाहरणे इतिहासात पाहायला मिळतात.

भारतातील काही विमान दुर्घटनाची आठवा.  १९७८ साली नववर्षाच्या पहिल्या दिवशी दुबईला जाणारे एअर इंडियाचे एक विमान मुंबईहून उड्डाण केल्यानंतर लगेचच समुद्रात कोसळले होते. त्या बोईंग ७४७ विमानातले सर्व २१३ प्रवासी मरण पावले. दुर्घटनेचे कारण तांत्रिक बिघाड आणि ‘पायलट गोंधळलेला होता’ असे निष्पन्न झाले. एप्रिल १९९३ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे एक विमान उड्डाण घेत असतानाच धावपट्टीवरून चाललेल्या एका ट्रकवर आदळले. जादा वजन आणि पायलटच्या चुकीमुळे दुर्घटना झाली असे मानले गेले.  ऑगस्ट २०२० मध्ये कोझिकोड इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरताना विमान धावपट्टीवरून पुढे जाऊन दरीत कोसळले होते. विमानाचे तुकडे तुकडे होऊन दोन पायलट सह २१ प्रवासी मरण पावले. त्याआधी १९९० मध्ये इंडियन एअरलाइन्सचे एक विमान बंगळुरू विमानतळाजवळ कोसळले आणि ९२ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. त्यातही पायलटची चूक होती असे दिसून आले.

मी वारंवार विमान प्रवास करतो. विदेशी एअरलाइन्सच्या  तुलनेत आपल्या देशातील हवाई प्रवास तितकासा सुखद आणि आरामदायक नाही. हवेत विमान हेलकावे खाते ही गोष्ट तर बाजूलाच ठेवू; विमान उतरताना अनेक प्रवाशांचे प्राण कंठाशी येतात. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. भारतात नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात अनेक गोष्टींकडे खरोखरच ‘झिरो टॉलरन्स’ धोरण ठेऊन लक्ष देण्याची गरज आहे. आपले एकही विमानतळ ‘टॉप २५’ मध्ये नाही ही शरमेची गोष्ट नाही का? गर्दीच्या बाबतीत इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्ट जगात नवव्या क्रमांकावर आहे; परंतु तेही जगभरातील सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीत ३२व्या नंबरवर दिसते. असे का?

एक शेवटचा प्रश्न : भारतात २००६ पासून २४ सालापर्यंत १० एअरलाइन्स बंद का झाल्या? प्रश्न खूप आहेत. पण एक सांगतो, न घाबरता हवाई प्रवास करा. त्यामुळे वेळ वाचतो आणि इतर माध्यमांच्या तुलनेत हा प्रवास सुरक्षितही आहे.

Web Title: Why is India so backward in air safety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.