ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:11 AM2021-10-05T07:11:33+5:302021-10-05T07:12:55+5:30

ममता गोव्यातल्या ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे ओढतील हे स्पष्टच आहे. दीदींचा प्रयोग यशस्वी झाला, तर भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त फटका बसेल.

What will Mamata Banerjee do after coming to Goa? It hit Congress more than BJP | ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका

ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टक्कर देण्याची क्षमता देशातील काँग्रेसमधील अनेक बडे नेते गमावून बसले आहेत.त्रिपुरा, गोव्यासारखी छोटी राज्ये निवडली गेली आहेत. काय असावे याचे कारण? सत्ताधारी भाजपच्याही मते ममतादीदींना गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा येत्या २०२४ मध्ये जिंकायच्या आहेत

सदगुरू पाटील 

निवासी संपादक, लोकमत, गोवा

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आयपेक कंपनीने आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे राजकारण ढवळून काढण्यास आरंभ केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममतादीदींना गोव्यासारख्या छोट्या राज्यात प्रवेश करावा असे का वाटले असावे, हा प्रश्न  केवळ गोव्यातच नव्हे तर, गोव्याबाहेरही कुतूहलाने विचारला जात आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते व त्या पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांची गोव्यात भेट झाली.  ब्रायन यांनी सगळे पत्ते उघड केले नाहीत, पण, मूळ हेतूही लपवून ठेवला नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टक्कर देण्याची क्षमता देशातील काँग्रेसमधील अनेक बडे नेते गमावून बसले आहेत. सगळेच जण जणू कोशात गेले आहेत. लढण्याची, काही करून दाखवण्याची,  कार्यकर्त्यांना पुन्हा संघटित करण्याची, त्यांना पुन्हा नवचैतन्य देण्याची क्षमताच जणू ते गमावून बसले आहेत  असे वाटते. देशातील युवा मतदार  राहुल गांधी यांना अजून गंभीरपणे घेत नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी मोदींच्या भाजपला चारीमुंड्या चीत केल्यानंतर ममतादीदी, त्यांच्या विश्वासातील खासदार, आमदार यांचाही आत्मविश्वास वाढला. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून  आपले नाव पुढे करायचे असेल, तर त्यासाठी काही राज्यांमध्ये आपली शक्ती  उभी करावी लागेल हे दीदी जाणून आहेत. 
त्यासाठी त्रिपुरा, गोव्यासारखी छोटी राज्ये निवडली गेली आहेत. काय असावे याचे कारण? 

ज्या राज्यांत हिंदुत्वाचे कार्ड वापरावे लागते, तिथे अगोदर न जाता सेक्युलर विचारसरणीचा प्रभाव असलेली राज्ये ममता दीदी निवडत असल्याचे दिसते. गोवा, त्रिपुरासारखी भूमी ही तृणमूल काँग्रेसला  अनुकूल वाटते. त्रिपुरामध्ये बंगाली भाषा आहे. गोव्याची लोकसंख्या १६ लाख तर त्रिपुराची लोकसंख्या ३७ लाख. छोट्या राज्यांमध्ये राजकीय काम उभे करण्यासाठी तुलनेने खर्चही कमी येतो. गोव्यासोबतच उत्तर प्रदेश, पंजाबच्याही निवडणुका येत्यावर्षी होणार आहेत, पण तृणमूलने अजून तिथे प्रवेश केलेला नाही.  खासदार ब्रायन यांना याविषयीचे कारण विचारले असता, पक्षाकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नाही असे ते बोलून गेले. गोव्यातील अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते व सत्ताधारी भाजपच्याही मते ममतादीदींना गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा येत्या २०२४ मध्ये जिंकायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयोग आताच सुरू झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी चाळीसपैकी काही जागा जरी जिंकल्या तर, आपली शक्ती उभी राहील असा विचार तृणमूल करत असल्याचे दिसते.

गोव्यात भारतीय जनता पक्षाचा प्रवेशदेखील १९९० च्या काळात असाच झाला होता. मात्र गोवा विधानसभेत खाते उघडण्यासाठी भाजपला १९९४ पर्यंत वाट पाहावी लागली होती. रामजन्मभूमी आंदोलनाने देशात जे हिंदुत्वाचे वारे तयार केले होते, त्याचा लाभ उठवत गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी भाजपला विधानसभेत प्रवेश मिळवून दिला. ममतादीदींना म्हणजे तृणमूल काँग्रेसला गोव्याच्या विधानसभेत येत्या निवडणुकीवेळी खाते उघडता येईल काय?, गोव्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अवघे चार महिने शिल्लक आहेत. तृणमूलला गोवा विधानसभेत खाते उघडणे मुळीच अशक्य नाही अशा प्रकारचा अहवाल प्रशांत किशोर यांच्या आयपेकने दीदींना दिलेला आहे. गोव्यात २५ टक्के अल्पसंख्याक मतदार आहेत. काँग्रेस पक्षाची ही हक्काची व्होट बँक. तृणमूल काँग्रेसने गोव्यात येताच याच व्होट बँकेला लक्ष्य बनविले आहे. प्रशांत किशोर यांनी प्रथम त्रिपुरामध्ये व मग गेल्या जून महिन्यापासून गोव्यात सर्वेक्षण सुरू केले. तृणमूल काँग्रेस पक्ष येथे रुजू शकतो, हा प्रशांत किशोर यांचा अंदाज. किशोर यांनी अभ्यासू व एमबीए वगैरे झालेल्या तरुणांची फळी गोव्यात राजकीय सर्वेक्षणासाठी कामाला लावली.

लुईझिन फालेरो ह्या मुरब्बी राजकीय नेत्याला काँग्रेसपासून विलग करण्यात व तृणमूलमध्ये त्यांना आणण्यात प्रशांत किशोर यांना यश आले. दोनवेळा गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री झालेले फालेरो हे गांधी कुटुंबाला अत्यंत जवळचे होते. तरीही त्यांना पस्तीसहून अधिक वर्षांनंतर काँग्रेस सोडण्यास प्रशांत किशोर यांनी भाग पाडले ही राष्ट्रीय बातमी ठरली. फालेरो स्वत: सांगतात की- आपण तृणमूलच्या कोणत्याच नेत्याला कधीच भेटलो नव्हतो, फक्त किशोर यांच्यासोबतच आपल्या काही बैठका झाल्या व आपण तृणमूलमध्ये पोहचलो. फालेरो यांना गोव्यातील ख्रिस्ती मतदारांमध्ये स्थान आहे व ख्रिस्ती धर्मगुरुंशी त्यांचे जवळचे नाते आहे. पहिल्या टप्प्यात ममतादीदी फालेरोंना तृणमूलचा चेहरा बनवत गोव्यात ख्रिस्ती मतदारांना स्वत:च्या बाजूने ओढतील हे स्पष्टच आहे. गोव्यात सध्या ख्रिस्ती व हिंदू धर्मीय राजकीय नेत्यांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स तृणमूल काँग्रेस पक्ष देत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने व भाजपनेही याचा धसका घेतलाय पण, दीदींचा प्रयोग यशस्वी झाला तर, भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त फटका बसेल.

Web Title: What will Mamata Banerjee do after coming to Goa? It hit Congress more than BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.