गेल्या १०० वर्षात ‘आज’ काय घडले? आपण ‘उद्या’ काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 08:28 IST2026-03-11T08:28:32+5:302026-03-11T08:28:52+5:30
गेल्या १०० वर्षांत ‘आज’ काय घडले? फक्त ‘आले वर्ष, सरले वर्ष, आता नवीन वर्ष’ अशा मानसिक चौकटीतच आपण मश्गूल राहणार का?

गेल्या १०० वर्षात ‘आज’ काय घडले? आपण ‘उद्या’ काय करणार?
अमृत बंग
सहसंचालक, ‘सर्च’ ‘निर्माण’
या युवा उपक्रमाचे प्रमुख
मार्च म्हटलं की आर्थिक वर्षाचा शेवट, विविध टार्गेट्स पूर्ण करण्याची घाई, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आदी मुद्दे सहसा मनात येतात. आपल्यापैकी अनेकजण यातच व्यस्त असतात. मात्र, गेल्या काही दिवसांत जगात सुरू असलेल्या युद्धखोरीच्या आणि मानवी मूल्यांच्या सरसकट पायमल्लीच्या घडामोडी बघताना, फक्त ‘आले वर्ष, सरले वर्ष, आता नवीन वर्ष’ अशा मानसिक चौकटीतच आपण राहणार की त्याहून काही व्यापक चिंतन करणार, कृतीच्या संधी शोधणार? जरा मागे वळून बघता गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात आजच्या दिवशी, म्हणजे ११ मार्चला, काय काय घडले बरे? त्या परिप्रेक्षात ‘आज’कडे बघितल्यास काय दिसते?
अनेकच विशेष गोष्टी घडल्या आहेत ११ मार्चला!
१९१८ - ५ कोटी लोकांचा बळी घेणाऱ्या फ्लू महामारीची पहिली केस रिपोर्ट झाली.
१९५५ - नोबेल पारितोषिक विजेते व पहिल्या अँटिबायोटिक पेनिसिलिनचे संशोधक अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू.
१९६६ - इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष व हुकूमशाहीकडे झुकू लागलेले सुकार्नो यांना पायउतार व्हावे लागले.
१९७३ - समलिंगी मुलांच्या पालकांची पहिली औपचारिक बैठक न्यूयॉर्कमधील ग्रीनविच व्हिलेजमधील चर्चमध्ये आयोजित केली गेली.
१९८५ - मिखाइल गोर्बाचेव्ह सोव्हिएत युनियनचे नेते बनले.
१९९० - पॅट्रिसिओ आयल्विन यांनी १९७० नंतर लोकशाही पद्धतीने निवडलेले चिली देशाचे पहिले अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
२०१८ - चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसने शी जिनपिंग यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ कमाल १० - वर्षांच्या मर्यादेपेक्षा वाढवण्यास मान्यता दिली.
२०२० - जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ ला ‘ग्लोबल पँडेमिक’ म्हणून जाहीर केले.
या एकूणच घटनापटाकडे बघताना इतिहासाची एक वर-खाली होणारी लाट दिसते. शंभर वर्षांच्या काळात आपण दोन मोठ्या रोगांच्या उद्रेकांना सामोरे गेलो, अनेकांनी जीव गमावला आणि इवल्याशा व्हायरसपुढे आपण किती हतबल होतो हे मानवाने अनुभवले; पण सोबतच आपण त्यांच्याविरुद्ध लसीदेखील तयार केल्या आणि प्रतिजैविकांमुळे बॅक्टेरियांवरदेखील मोठ्या प्रमाणात विजय मिळवला. मानवी कल्पनांच्या व प्रयत्नांच्या उर्मीने परिस्थितीच्या रेट्यापुढे न झुकता त्यावर मात केली.
राजकीय स्वातंत्र्य, मानवी मूल्ये, लोकशाही याबाबत काय चित्र दिसते? - शीतयुद्धाचा अंत आणि यूएसएसआरची अर्थव्यवस्था सुधारणे हा मिखाइल गोर्बाचेव्ह यांचा मुख्य हेतू होता. त्यासाठी त्यांनी ‘ग्लासनोस्त’ (मोकळेपणा) आणि ‘पेरेस्त्रोइका’ (आर्थिक/राजकीय पुनर्रचना) ही दोन प्रमुख धोरणे आणली. ग्लासनोस्तअंतर्गत सरकारी कारभारात पारदर्शकता वाढवणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यावर भर होता, लोकांना त्यांचे मत अधिक मुक्तपणे व्यक्त करण्याची परवानगी दिली गेली. सेन्सॉरशिप कमी करण्यात आली आणि सरकारवर टीका करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, आजच्या रशियामध्ये हे कुठेही दिसत नाही, आणि गेली अनेक वर्षे रशिया पुतीन यांच्या हुकूमशाही मगरमिठीत पूर्णपणे आवळला गेला आहे.
सध्या जगातील / भारतातील परिस्थिती काही फार वेगळी आहे का? - बरोबर ९६ वर्षांपूर्वी १२ मार्चला महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेच्या मीठ मक्तेदारीविरुद्ध प्रतिकार व अहिंसक निषेधाची थेट कृती मोहीम म्हणून ऐतिहासिक दांडी यात्रेची सुरुवात केली होती. आपण उद्यापासून काय करू शकतो?