लेख: रस्त्यावर न उतरता वर्तमानाचा गळा धरते ‘कविता’च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:03 IST2026-02-07T11:01:10+5:302026-02-07T11:03:51+5:30
कवितेला विद्रोहाची हौस नसते; पण अध:पतनाचं समर्थन करणारं वर्तमान अंगावर येतं तेव्हा भोवतालची परिस्थितीच कवितेच्या हातात काळा झेंडा देते.

लेख: रस्त्यावर न उतरता वर्तमानाचा गळा धरते ‘कविता’च!
‘तथापि’ हा शब्द स्वतःमध्येच एक थांबा, एक प्रतिवाद सुचवतो. या शीर्षकातून तुम्हाला नेमकी कोणती भावस्थिती व्यक्त करायची होती? कुठलाही काळ जगण्यासाठी अनेक प्रश्नांनी वेढलेलाच असतो. आरंभी अन्न मिळवणं हेच पूर्णब्रह्म होतं. शेतीचा शोध लागल्यावर हक्काचं अन्न मिळू लागलं. तरीही काहीजण उपाशी राहिलेच. आता अन्न कसं पचवायचं हाही प्रश्न आहे. नवनव्या प्रश्नांनी जगणं व्यापलेलं असतं, ‘तथापि’ जगणं मात्र थांबत नाही. न थांबलेल्या जगण्याची गोष्ट समजून घ्यायला नि सांगायला मला आवडतं. म्हणून तथापि! तूर्तास’, ‘तत्पूर्वी’ आणि ‘तथापि’ ही तीन शीर्षके काळाची दिशा दाखवतात.
हा केवळ योगायोग आहे? काळाशी असलेला अनुबंध महत्त्वाचा. आपण कुठल्या काळात जन्मतो-जगतो याला फार महत्त्व असतं. भोवतालाचे परिणाम पचवून आपण वर्तमान चघळतो. वर्तमानाचं मला झालेलं आकलन अंतिम नसलं तरी महत्त्वाचं असतं. मला तूर्त असं आणि एवढंच कळलंय म्हणून तूर्तास! माझं सांगणं भोवताल थांबवतो की काय, अशी भीती वाटतेय म्हणून तत्पूर्वी!! आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी सांगणं संपत नाही म्हणून तथापि!!!
या संग्रहातील कवितांमध्ये स्वीकार आणि प्रतिकार यांचा सततचा संघर्ष जाणवतो. तो कशामुळे?
स्वीकार आणि प्रतिकार हे जगण्याचं मर्म. काहीतरी जळल्याशिवाय उजळणं नाही. ‘दोन टिपरी, एकच ताल’ असं तुकोबांनी म्हणल्याप्रमाणे स्वीकार व प्रतिकार हे विरुद्ध असले तरी आपली समज परिपक्व करणारेच असतात. आज समाजजीवनात स्वीकार कशाचा व किती करावा? याचा संभ्रम झाल्यामुळे प्रतिकाराची बिभत्स रूपं समोर येतायत. विरोधी विचार स्वीकारायची गरज नाही; पण त्याचा आदर करता यायला हवा.
या कविता वैयक्तिक अनुभवांपासून सामाजिक वास्तवापर्यंत प्रवास करतात, ते कसं?
मोअर पर्सनल्, बिकम्स मोअर युनिव्हर्सल असं म्हणतात. माणूस म्हणून माणसाच्या मूळ सत्वाजवळ जाता आलं तर ते समष्टीचं होतं. कवितेतील अनुभवात इतरांना सामील करून घेता यायला हवं. गंगेचं पाणी गंगेलाच अर्पण करावं तसे समष्टीत आलेले अनुभव मी समाजापर्यंत कवितेतून पोहोचवत असतो.
स्त्रीजाणिवेच्या कवितांमध्ये तुम्ही स्त्रीची भाषा वापरता. ती आत्मसात कशी झाली?
मी ग्रामीण भागात वाढलोय. त्यामुळे ग्रामीण स्त्रियांची चित्रं माझ्या मनात ठळक आहेत. चुलीच्या धुरात धूसर झालेली, शेतात राबणारी, पिसाट पुरुषी शरीर सोसणारी, ‘ब्र’ न उच्चारणारी स्त्री मी पाहत आलोय. तपशील बदललेत; पण परिस्थिती फारशी बदललेली नाही. शहरी स्त्रियांचे प्रश्न अजून वेगळे आहेत.
तुमच्या कवितेत निर्जीव वस्तूही बोलतात..?
मानवाने स्वतःच्या दृष्टीने सृष्टीची व्यवस्था निर्माण केली. भाषेची गंमत पाहा, ‘बैल काम करतो’, ‘गाय दूध देते’ ही वाक्यं व्याकरणदृष्ट्या अचूक; पण अर्थामध्ये मानवी चलाखी आहे. कुठला बैल स्वतःहून काम करतो? कुठल्या गायीला आपल्या लेकरासाठीचं दूध माणसाला द्यावं वाटेल? आपल्या दृष्टिकोनातून भोवतालाचे अर्थ लावणे हा एक भाग झाला; पण सर्जनशील लेखनात निर्जीवालाही सजीव करण्याची किमया असते. ढग सजीव झाला नसता तर कालिदासांचा मेघ‘दूत’ झालाच नसता.
प्राणी-पक्षी बोलले नसते तर इसापनीती निर्माण झाली असती का? दगडातही ‘देव’ आहे, याचा खरा अर्थ शिल्पकारालाच कळतो, म्हणून वेरूळ-अजिंठा निर्माण होतात. अर्थात कुठल्याही निर्मितीमागे अस्वस्थता असतेच.
‘जाब’सारख्या कवितेत शहरांनी गिळलेल्या शेतांचा प्रश्न येतो; पण तो पारंपरिक शोकात्म पद्धतीने येत नाही?
बिबट्या गावात आल्याच्या बातम्या नेहमीच येतात; पण आपण त्याच्या जंगलात किती घुसलोय, याचा विचार कोणी करीत नाही. जंगलं नष्ट केली, नद्या संपवल्या, डोंगर कापले... तरीही हाव संपत नाही. वाट्टेल तसं, वाट्टेल तेच हा माणसाचा हेका घातक आहे. गायी-म्हशींना चारापाणी केल्याशिवाय स्वतः तोंडात घास न घेणारी संस्कृती संपते आहे. ‘जाब’ कवितेतला सांड कॉलनीत येऊन डुरकतो तेव्हा त्याचं रान नष्ट केलेल्या माणसांना जाब विचारतो अशी ती कल्पना.
कविता ही वर्तमानाची नोंद आहे की साक्ष?
इथे नोंद करण्यामागचा हेतू साक्ष देणे हाच आहे. अस्मानी संकटं येतात, माणूस हतबल होतो. सुलतानी संकटं येतात तेव्हा अधिक व्यथित होतो. ही हतबलता माणसाच्या क्षुद्रत्वाची जाणीव करून देते. अजूनही प्यायला स्वच्छ पाणी मिळू नये, हे मला अस्वस्थ करणारं आहे. अध:पतनाचं समर्थन करणारं वर्तमान सारखं अंगावर येतं. मी रस्त्यावर उतरू शकत नाही. अशावेळी माझ्याजवळ वर्तमानाचा गळा धरण्यासाठी कवितेचाच मार्ग शिल्लक राहतो.
‘लई नाही मागणं’ या कवितेत तुम्ही आधुनिक पसायदान मागता. आजच्या काळात कविता आशेची भाषा बोलू शकते?
प्रत्येक काळातला कवी काहीतरी मागत असतो. अर्थात हे मागणं समष्टीसाठी असतं. ‘हेचि दान देगा देवा’पासून ते ‘गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला...’पर्यंत मागण्याला ज्ञानदेवांच्या पसायदानाची परंपरा आहे. कविता नैराश्य मांडते तेव्हा तिला आशावादाची आस असते. कविता मांगल्याच्या अभावातून अभद्र बोलते. कविता प्रेमाच्या आसक्तीतूनच नकार मांडते. कवितेला विद्रोहाची हौस नसते. भोवतालची परिस्थिती तिच्या हातात काळा झेंडा देते. परिस्थिती कितीही विमनस्क असली तरी कापलेल्या झाडाच्या खोडावरची दोन नवथर कोवळी पानं होऊन कविता वाऱ्याबरोबर हलतच असते.