लेख: रोज आकाशात उडणाऱ्यांना हवी साथ... आणि सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:32 IST2025-06-21T06:31:47+5:302025-06-21T06:32:48+5:30
पायलट, हवाई परिचारिका यांच्यावरील अतिरिक्त ताणाची कल्पनाही येणे कठीण! त्यांच्या मानसिक आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

लेख: रोज आकाशात उडणाऱ्यांना हवी साथ... आणि सुरक्षा
अभिलाष खांडेकर,
रोव्हिंग एडिटर, लोकमत
अहमदाबादमधील हृदयद्रावक विमान अपघाताचे दुःख इतके खोल आहे की तो विसरायला अनेक दिवस, कदाचित आठवडेही लागतील. विशेषतः त्या छोट्या मुलाला, आर्यन असारीला, ज्याने केवळ कुतूहलापोटी अपघाताचे चित्रीकरण केले. त्याने काढलेला व्हिडिओ खूपच प्रसिद्ध झाला आहे. परंतु सर्वांत मोठे दुःस्वप्न त्यांच्यासाठी ठरले ज्यांचे आप्तजन काही सेकंदांत मृत्युमुखी पडले.
ही गोष्ट केवळ त्या भारतीय किंवा परदेशी प्रवाशांची नाही, जे एअर इंडियाच्या ड्रीमलायनर अपघातात मरण पावले, तर ती त्यांचीही आहे जे जगभर सतत प्रवास करत असतात. आपले व्यावसायिक वा कौटुंबिक कर्तव्य निभावत यापुढेही ते प्रवास करतच राहतील; पण एक खोल भीती त्यांच्या मनात घर करून बसेल. या अपघाताच्या निमित्ताने हेही लक्षात ठेवायला हवे की आपण वर्षानुवर्षे सुखरूप प्रवास करत आलो आहोत, कारण प्रशिक्षित वैमानिक, कर्मचारी आपली काळजी घेत आपल्याला सुरक्षित घरी पोहोचवत आले आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि इतर अनेक जण मृत्युमुखी पडले. विमान अपघात तपास संस्था (एएआयबी), एअर इंडिया, बोइंग कंपनी आणि इतर विमानतज्ज्ञ या अपघाताचे कारण शोधत आहेत. अपघातानंतर ‘ब्लॅक बॉक्स’ आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर मिळाले असून, लवकरच त्यामधून १२ जूनच्या अपघाताचे कारण स्पष्ट होईल. विमान अपघात इतर अपघातांपेक्षा अधिक तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. अहमदाबादनंतर संपूर्ण देशात उठलेली सहवेदना आणि दुःखाची लाट २०२३ मध्ये ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या २९६ जणांचा बळी घेणाऱ्या रेल्वे अपघातानंतर मात्र दिसून आली नव्हती. हा भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एक होता. त्यावेळी रेल्वे मंत्रालयावर निष्काळजीपणा आणि देखभालीसंदर्भात गंभीर आरोप झाले होते. पण विमान वाहतूक क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (आयसीएओ) आणि अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) या दोन्ही संस्थांनी भारत ज्या हवाई मानकांचे पालन करतो त्याला जागतिक सरासरीपेक्षा जास्त रेटिंग दिले आहे. २०१८ मध्ये भारताची सुरक्षा रेटिंग ६९.९५ टक्के होती, ती २०२२ मध्ये ८५.६५ टक्क्यांवर गेली, जेव्हा ‘आयसीएओ’ने ‘डीजीसीए’चे (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) परीक्षण केले. ‘आयसीएओ’च्या निकषांचे भारत १०० टक्के अनुपालन करत आहे.
भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा विमान वाहतूक बाजार आहे. ‘उडान’ योजनेमुळे २०१७ पासून भारतात देशांतर्गत ६००हून अधिक मार्ग आणि ९०हून अधिक विमानतळ जोडले गेले आहेत. अमेरिका आणि चीननंतर भारत हा तिसरा सर्वांत मोठा देशांतर्गत विमान बाजार आहे. अशा मोठ्या दुर्घटनांनंतर भारताने अधिक सावध आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्याधुनिक व्हावे, ही काळाची गरज आहे.
‘एफएए’ने भारताला २०२१ मध्ये प्रथम श्रेणीमध्ये ठेवले असले तरी अहमदाबाद अपघाताने आपल्याला स्मरण करून दिले आहे की विमान उड्डाणासंदर्भात सर्व मानके, कार्यपद्धती काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजेत. त्यात कोणत्याही यांत्रिक वा मानवी चुकांना थारा नसावा. या सगळ्याबरोबरच, आता गरज आहे ती आपल्या वैमानिक, सहवैमानिक, कर्मचारी, ग्राउंड स्टाफ, एरोनॉटिकल इंजिनिअर्स आणि एअर ट्राफिक कंट्रोलमध्ये कार्यरत असणाऱ्यांचे मनोबल वाढवण्याची. शेवटी वैमानिकही माणूस आहे. वैमानिकांप्रमाणेच हसतमुख विमान परिचारिका रोज आपले प्राण धोक्यात घालतात. जेव्हा प्रवाशांना अपघाताची भीती वाटते, तेव्हा वैमानिक आणि कर्मचारी अधिक तणावाखाली असतात. ‘मे डे’ कॉलनंतर कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या मनात काय सुरू होते, याची आपण कल्पना करू शकतो का?
अहमदाबादची दुर्घटना वैमानिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण आणणारी ठरू नये. विमानतळे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण सुरक्षित असावीत यासाठी सरकारी आणि खासगी विमान कंपन्यांनी अधिक प्रयत्न करायला हवेत. कर्मचारी आणि वैमानिकांचा ताण कमी व्हावा. त्यांचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास, प्रशिक्षण आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देण्याची आज गरज आहे.