Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 09:32 AM2022-11-23T09:32:24+5:302022-11-23T09:34:55+5:30

गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निवडणूक रणनीतीविषयी इसुदान गढवी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचित.

There is no BJP in Gujarat, AAP will come to power aam aadmi party CM candidate Isudan Gadhvi's claim | Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

Gujarat Assembly elections: गुजरातमध्ये भाजप नाही, ‘आप’च सत्तेवर येणार! CM पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दावा

Next

पत्रकारिता सोडून आपण राजकारणात कसे आणि का आलात?
मी मुळात शेतकरी कुटुंबातला, देवी मातेला वाटले म्हणून पत्रकार झालो. जे वाईट आहे ते मी लोकांसमोर आणत होतो, पण गरजूंना मदत करू शकत नव्हतो. म्हणून देवी मातेच्या प्रेरणेनेच मी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्षच का? काँग्रेस किंवा भाजप का नाही?
या दोन पक्षांमुळेच तर गुजरातची आजची हलाखीची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनामुळे लोक मरत असताना लक्ष देणारे कोणी नव्हते. संपूर्ण देशात जे गुजरात मॉडेल विकले जात आहे, त्याचे वास्तव गुजराती लोकांना ठाऊक आहे. बेरोजगारी वाढत आहे. काँग्रेसने तर भाजपपुढे गुडघेच टेकले आहेत. हळूहळू आम आदमी पक्षच देशातला मुख्य विरोधी पक्ष होत चालला आहे.

आपल्या पक्षाचे गुजरातमध्ये काय भविष्य दिसते? 
मागच्या निवडणुकीनंतर भाजप मोठ्या मुश्किलीने सरकार स्थापन करू शकले. काँग्रेसची इच्छा असती तर मागच्या वेळीच सरकार स्थापन झाले असते. पण आता काँग्रेस पक्ष इतका कमजोर झाला आहे की गेल्या वर्षी जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत ३१ पैकी एकही जागा या पक्षाला मिळविता आली नाही. आता हे दोन्ही पक्ष लोकप्रियतेपासून खूप लांब गेले असल्याने लोक आम आदमी पक्षाकडे आशेने पाहत आहेत. 

निवडणूक सर्वेक्षणांचे निकाल तसे सांगत नाहीत..
मी स्वतः माध्यमांमध्ये होतो.. सर्वेक्षणे कशी केली जातात हे मला ठाऊक आहे. गुजरातच्या शहरी भागातील ६६ जागांपैकी किमान अर्ध्या जागांवर भाजप अडचणीत आहे. आम्हाला फक्त सुरतमधल्याच आठ किंवा नऊ जागा मिळतील. ग्रामीण भागातल्या २५ ते ३०  जागांवर भाजपला अतिशय कठीण लढत द्यावी लागत आहे. आत्ता लोक भाजपच्या भीतीने गप्प आहेत, पण मतदान करताना ते नक्कीच घाबरणार नाहीत.

आपले मुद्दे काय आहेत? 
 ‘महामंथन’ या नावाने चालणारा माझा एक तासाचा कार्यक्रम टीव्हीवर फार प्रसिद्ध होता. त्यात प्रत्येक गावातले प्रश्न मी मांडलेले आहेत. लोकांच्या प्रश्नांचे मला जेवढे आकलन आहे तेवढे गुजरातेत कोणाला असेल असे मला वाटत नाही. राज्यात ५० लाख बेकार युवक आहेत. ६७ लाख शेतकरी आहेत. सगळे हैराण आहेत. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे इथेही आम्हाला लोकांना मोफत वीज आणि पाणी द्यायचे आहे. 

राजकारणात आपल्याला अनुभव नाही, त्याचे काय?
मी सोळा वर्षे राजकीय पत्रकारिता केली. अनेक राजकीय पक्ष धोरण ठरवण्यासाठी माझ्या संपर्कात असत. कोणते मुद्दे उपस्थित करावेत, निवडणूक कशी जिंकावी आणि सरकार कसे चालविले पाहिजे हे सगळे मी सांगत असे. तेव्हा या सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव माझ्याकडेच आहे.

गुजरातमध्ये यावेळी भाजप नव्हे तर मोदीजी निवडणूक लढत आहेत. आपण त्यांचा सामना कसा करणार?
उलटे आहे, यावेळी मोदीजी नव्हे भाजप निवडणूक लढवत आहे. हळूहळू भाजपला हे समजून चुकले आहे की आपल्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. भ्रष्टाचार प्रशासनामध्ये खोलवर रुजला आहे. विषारी दारूने ७५ लोकांचा जीव जातो. कोणालाही शिक्षा होत नाही. पूल तुटून कित्येक लोक मरण पावतात, पण कोणालाही दोषी ठरवले जात नाही. जनता खूप शहाणी असते. गुजरातमध्ये लोकसभेसाठी मोदींना मते पडतील आणि विधानसभेसाठी ‘आप’ला !

मागच्या निवडणुकीत अल्पेश ठाकूर,  हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण नेते काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपत आहेत. 
काँग्रेस भाजपची बी टीम झाली आहे, हेच तर मी म्हणतोय.­ मागच्या आठ वर्षांत काँग्रेसचे ६५ मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले. मागच्या पाच वर्षांत काँग्रेसचे १५ आमदार भाजपत गेले. आज काँग्रेसजवळ नेता नाही. कार्यकर्ते नाहीत आणि मुद्देही नाहीत. जर भाजप इतका बळकट आहे, तर पाच वर्षांत त्यांना तीन मुख्यमंत्री का बदलावे लागले? 

आपल्या एका उमेदवाराने अर्ज मागे का घेतला? 
दुसऱ्या पक्षाच्या लोकांना धमक्या देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावणे हे भाजपनेच केले आहे.. एका जागेवर त्यांनी केले; परंतु उरलेल्या १८१ जागांवर काय करणार?

Web Title: There is no BJP in Gujarat, AAP will come to power aam aadmi party CM candidate Isudan Gadhvi's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.