आता नवी त्रिकोणी वास्तुही लोकशाहीचे प्रतीक असेल, हे अपेक्षितच आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 09:41 AM2023-09-19T09:41:23+5:302023-09-19T09:42:25+5:30

भारतीय संसदेची ऐतिहासिक वर्तुळाकार इमारत आता पडद्यामागे जाते आहे. या वास्तूने भारतीय लोकशाहीचा पंचाहत्तर वर्षांचा प्रवास अनुभवला!

The new triangular architecture will be a symbol of democracy; Bidding farewell to the old building of Parliament... | आता नवी त्रिकोणी वास्तुही लोकशाहीचे प्रतीक असेल, हे अपेक्षितच आहे

आता नवी त्रिकोणी वास्तुही लोकशाहीचे प्रतीक असेल, हे अपेक्षितच आहे

googlenewsNext

पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री

मंगळवारी सकाळी संसदेच्या नवीन इमारतीमध्ये पहिली बैठक होणार आहे. जुन्या ऐतिहासिक वर्तुळाकार इमारतीचा वापर काही वेगळ्या कामाकरता होईल. गेली ७५ वर्षे या ऐतिहासिक इमारतीमध्ये संसदेचे कामकाज चालत होते. याच इमारतीमध्ये भारताच्या संविधानाची निर्मिती झाली.  जुन्या इमारतीमध्ये लोकसभा, राज्यसभा व केंद्रीय कक्ष (सेंट्रल हॉल) आहेत. चौथ्या हॉलचा वापर अलीकडे वाचनालय म्हणून केला जातो. सर्व प्रमुख मंत्र्यांच्या कार्यालयांचा वापर संसदेच्या अधिवेशनाच्या काळात होत असे. मी जवळजवळ अठरा वर्षे संसद सदस्य म्हणून दोन्ही सभागृहांचा सदस्य व मंत्री म्हणून काम केले. मंत्री असताना याच इमारतीमध्ये माझे  स्वतंत्र कार्यालय होते. पण कायम स्मरणात राहील असे कामकाज केंद्रीय कक्षामध्येच होत असे. 

केंद्रीय कक्षामध्ये संसदेच्या संयुक्त बैठका होतात. अलीकडे त्याचा औपचारिक वापर वर्षातून फक्त एकदा होतो. संसदेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या आरंभी  राष्ट्रपती मिरवणुकीने केंद्रीय कक्षामध्ये येऊन  भाषण करतात. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शासनप्रमुखांच्या भारत भेटीवेळी संसदेच्या दोन्ही सदनांच्या सदस्यांना उद्देशून भाषणाची परंपरा आहे. ती सर्व व्याख्याने संसदेच्या केंद्रीय कक्षातच होतात. १९५३ ते २०२१ या कालखंडात आत्तापर्यंत ४० च्यावर शासन प्रमुखांनी संसदेच्या केंद्रीय कक्षामध्ये खासदारांसमोर भाषणे केली आहेत. इतर वेळी या कक्षाचा वापर संसदेच्या  आजी-माजी सदस्यांना आपापसात व ज्येष्ठ पत्रकारांसोबत मनसोक्त गप्पा मारण्याकरता होतो. चर्चा रंगतात. पण कोविड काळामध्ये नरेंद्र मोदींनी पत्रकार व माजी संसद सदस्यांच्या प्रवेशावर बंदी घालून जणू काही संसदेचा आत्माच नष्ट केला.

लोकसभेच्या सभागृहामध्ये ५४३ सदस्य तसेच अध्यक्ष, कर्मचारी वर्गाची  आसनव्यवस्था आहे.  सभागृहामध्ये अत्याधुनिक ध्वनिक्षेपकाची यंत्रणा वेळोवेळी बसवली जाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सदस्यांना मतदान करता यावे याकरताही यंत्रणा आहे. मतदानाचा निकाल  डिस्प्ले बोर्डवर दिसतो. १९९४ मध्ये शिवराज पाटील हे लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी लोकसभेच्या कामकाजाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फक्त प्रश्नकाळच प्रक्षेपित होत असे, नंतर संपूर्ण कामकाज दाखवायला सुरुवात झाली. 
राज्यसभेच्या सभागृहामध्ये अडीचशे खासदारांची बैठक व्यवस्था आहे.  राज्यसभेचे सभापती म्हणजेच देशाचे उपराष्ट्रपती यांचेही मध्यस्थानी आसन आहे.

लोकसभेच्या सभागृहामधील सर्व गालिचे, पडदे, बसायच्या बाकावरील आवरण हे सर्व हिरव्या रंगाचे, तर राज्यसभेतील हे सर्व लाल रंगाचे. ही परंपरा आपण ब्रिटिश पार्लमेंटमधून घेतली आहे. संसदेचे कामकाज  सकाळी ठीक अकरा वाजता सुरू होते. सहा वाजता संपायची अधिकृत वेळ असली तरी खूप उशिरापर्यंत अधिवेशन चालते, पण सुरू मात्र अकरा वाजताच होते. भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना १९९७ मध्ये झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये मी  चर्चेत भाग घेतला होता. एखाद्या विषयावर किती वेळ चर्चा करायची हे संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये ठरते. प्रत्येक पक्षाला सभासद संख्येच्या प्रमाणात वेळ दिला जातो.  त्या वेळेत किती सदस्य किंवा कोण बोलणार हे त्या पक्षाच्या प्रतोदाने ठरवायचे. अर्थात, ही मर्यादा फार काटेकोरपणे पाळली जात नाही. खरे कौशल्य कमीत कमी वेळात अत्यंत प्रभावीपणे आपला मुद्दा मांडणे यातच असते. तोच खऱ्या अर्थाने उत्कृष्ट संसदपटू. सभागृहात सर्वसाधारणपणे हिंदी व इंग्रजीमध्ये चर्चा होते पण अध्यक्षांची विशेष परवानगी घेऊन व भाषण लिखित स्वरूपात कार्यालयाला दिल्यानंतर एखाद्या सदस्याला आपल्या मातृभाषेत बोलता येते. त्याचे तत्काळ भाषांतर करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. 

पंतप्रधानांची  सभागृहातील उपस्थिती हा एक महत्त्वाचा विषय आहे. प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हे संसदेला सर्वोच्च प्राधान्य देत असत. ते बहुतेक दररोज थोडा वेळ तरी संसदेत उपस्थित राहून सदस्यांची भाषणे ऐकत. विरोधी पक्षनेत्याच्या भाषणासाठी तर ते आवर्जून सभागृहात उपस्थित असत, पण नंतर अनेक पंतप्रधानांनी संसदेतील उपस्थिती कमी केली, त्यामुळे एका दृष्टीने संसदेचे महत्त्वच कमी होत गेले. संसदेच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. १५ ॲागस्ट १९४७ च्या मध्यरात्रीचे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण, १९५० मध्ये संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधानसभेच्या सदस्यांनी स्वाक्षरी करण्याचा प्रसंग हे त्यातले प्रमुख! परंतु डिसेंबर २००१ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, ज्यात अनेक बहादूर कर्मचाऱ्यांचे निधन झाले, ती एक अत्यंत दुःखद घटना होती.

संसदेच्या दोन्ही सभागृहांतल्या माझ्या अठरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक अविस्मरणीय भाषणे ऐकली आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळाचा एका मताने झालेला पराभव व त्यावेळचे अटलजींचे भाषण मी ऐकले आहे. पंतप्रधान नरसिंहराव व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आणलेले आर्थिक सुधारणांचे पर्व  मला अनुभवायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर चालवलेला महाअभियोगाचा खटला व त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांचे भाषण. मी प्रधानमंत्री कार्यालयाचा राज्यमंत्री असताना अणु करारावरील माझी भाषणे असे अनेक प्रसंग मला आठवतात. आता संसदेचे नवे त्रिकोणी सभागृह सुरू होते आहे. गेल्या ७५ वर्षांत जुने वर्तुळाकार संसद भवन हे भारताच्या लोकशाहीचे प्रतीक बनले, आता नवी त्रिकोणी वास्तुही लोकशाहीचे प्रतीक असेल, हे अपेक्षितच आहे!

Web Title: The new triangular architecture will be a symbol of democracy; Bidding farewell to the old building of Parliament...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद