शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथजींचा मनस्ताप थांबवा

By admin | Updated: May 6, 2017 00:17 IST

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी लांबतच चालली असल्याने ते वैतागले आहे. आपल्या नातेवाइकांसाठी

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी लांबतच चालली असल्याने ते वैतागले आहे. आपल्या नातेवाइकांसाठी अतिशय अल्पदरात सरकारी जमीन खरेदी केल्याचे प्रकरण त्यांच्यावर बेतले आहे. त्यापायीच दि. ४ जून २०१६ला त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनाही तो ‘नाइलाजाने’ स्वीकारावा लागला. राज्यात भाजपा-सेना युतीला बहुमत मिळाले तेव्हा त्याच्या मुख्यमंत्रिपदावर यायला सर्वस्वानिशी सज्ज असणाऱ्या खडसे यांच्याऐवजी पक्षाने फडणवीसांचे नाव पुढे केले तेव्हा ते काही काळ रुसूनही बसले होते. मुख्यमंत्रिपदाऐवजी आताचा वनवास त्यांच्या वाट्याला यावा ही बाब त्यांच्या जिव्हारी लागणारीही आहे. एका अर्थाने शशिकलाबार्इंच्या वाट्याला जे दक्षिणेत आले तसेच काहीसे खडस्यांच्याही वाट्याला आले आहे. त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्या.डी.एस. झोटिंग यांची समिती मुख्यमंत्र्यांनी नेमली व तिने आपला अहवाल तीन महिन्यात सरकारला द्यावा असे निर्देशही तिला दिले. पण अशा चौकशा ठरलेल्या मुदतीत कधी होत नाही. झोटिंग समितीने आपल्यासाठी तीन वेळा जास्तीची मुदत मागून घेतली. ती ३१ मार्चला संपली. तरीही तिचा अहवाल अजून गुलदस्त्यात राहिला आहे. त्याचमुळे ‘हा नुसता चौकशीचा देखावाच नव्हे तर माझ्याविरुद्ध सुरू असलेले घाणेरडे राजकारण आहे’, असा आरोप खडसे यांनी केला आहे. जळगाव या त्यांच्या कार्यक्षेत्रात लेवापाटील या त्यांच्याच समाजाचा एक मोठा मेळावा भरवून त्यात ‘चौकशी समितीला व तिच्या निष्कर्षांना मी भीत नाही’, असे तर त्यांनी सांगितलेच, शिवाय ‘आपण स्वच्छ व निर्दोष असल्याचेही’ त्यांनी जाहीर केले. त्यांना त्यांच्या राजीनाम्याचा राग नाही, चौकशीचाही कंटाळा नाही, त्यांचा संताप आहे तो त्यांच्याविरुद्ध चाललेल्या ‘घाणेरड्या राजकारणाचा’. एवढी वर्षे मंत्रिपदावर व त्याआधी विधिमंडळात राहून जनतेच्या सेवेत वय घालविलेल्या सेवेकरी वृत्तीच्या माणसाला त्याच्या वाट्याला आलेल्या रिकामपणाचाही राग असणार. तो त्यांनी त्यांच्याच क्षेत्रात व त्यांच्याच समाजात व्यक्त केला असेल तर तेही समजून घ्यावे असेच आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याचा विचार करीत आहात काय? या एका वृत्तपत्राच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता ‘मी या घाणेरडेपणाला कंटाळलो आहे’ असे ते म्हणाले. भाजपा हा त्यांचा पक्ष देशाला स्वच्छतेचे धडे देणारा व तसे स्वप्न दाखविणारा आहे. तोच पक्ष आपल्याबाबतीत मात्र घाणेरडेपणा करतो ही बाब खडसे यांच्यासारख्या संवेदनशील पुढाऱ्याला डाचत असेल तर ते स्वाभाविकही म्हटले पाहिजे. याच काळात शेतकऱ्यांवरील कर्जे माफ करून त्यांचा सात-बारा कोरा करण्याची जी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासह शिवसेनेने चालविली आहे तिला उघड पाठिंबा देऊन खडसे यांनी आपल्या पक्षाला विधानसभेत खाली पाहायलाही लावले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने याच मागणीसाठी राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेचे आपल्या फार्महाऊसवर स्वागत करून त्यांच्या मागणीविषयीची आपली आस्थाही त्यांनी प्रगट केली आहे. या काळात फडणवीस यांच्या सरकारवरची आपली नाराजी ते यथाशक्ती व जमेल तेव्हा प्रगटही करीत राहिले आहेत. सत्तेबाहेर गेलेला माणूस बरेचदा समाजाच्या विस्मरणात जातो. तसे होणार नाही याची काळजीही आपल्या वक्तव्यांनी ते घेत राहिले आहे. कारण त्यांच्या मते ते स्वच्छ आहेत आणि चौकशीतही ते तसे असल्याचे सिद्ध होणार आहे. ते एकदा झाले की पुन्हा मंत्रिपद येणार आणि खडस्यांची लोकसेवा पुन्हा सुरू होणार. त्या दिवसासाठी आपली नाराजी उघडपणे सांगणे व आपल्या समाजाला ती ऐकवित राहणे त्यांना गरजेचे वाटत असेल तर त्यांची ती चिंता आपणही समजून घेतली पाहिजे. गंमत ही की, त्यांच्या चिडण्याकडे सरकारला लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यांना उत्तर द्यावे वा त्यांची दखल घ्यावी असे दानव्यांनाही वाटत नाही. एवढी प्रदीर्घ पक्षसेवा ज्याच्या नावावर आहे त्या कार्यकर्त्या-पुढाऱ्याची अशी उपेक्षा पक्ष व सरकार यांना गंभीरपणे घ्यावीशी वाटू नये हा खडसे यांच्या संतापाचा वा आपल्याही कुतूहलाचा विषय आहे. खडसे यांना घालवूनही पक्ष निवडणुका जिंकत राहिला. त्याने जिल्हा परिषदा जिंकल्या, महापालिका जिंकल्या आणि नगरपालिकाही ताब्यात आणल्या. खडसे नसले तरी (की नसल्यामुळेच) आपण ते करू शकलो हा त्यांच्या पक्षाचा आत्मविश्वासही खडसे यांच्या रागाचा विषय होणे अस्वाभाविक नाही. या स्थितीत झोटिंग समितीला आणखी एक मुदतवाढ मिळते की, ती चौकशी तशीच रेंगाळत व रखडत पुढे जाते हा राजकारणातील खेळींचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना बरेच काही शिकवू शकणारा विषय आहे. या विषयाचा खडसे यांना होणारा मनस्ताप हा मात्र महाराष्ट्राच्या चिंतेचा विषय आहे. असो. झोटिंग समितीने तिचे काम चोख करावे, जमलेच तर ते वेळेत करावे आणि खडसे यांना ते ज्या घाणेरड्या राजकारणात सापडले आहे असे वाटते त्यातून त्यांनी लवकर व स्वच्छपणे बाहेर यावे, एवढेच येथे म्हणायचे. घाणेरड्या जागेत कोणालाही उभे राहावे लागणे ही बाब तशीही वाईटच आहे. शिवाय आपण आता स्वच्छ भारताची व तशा राजकारणाची शपथही घेतली आहे.