शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:33 PM

देशाचे उद्योगमंत्री, संरक्षणमंत्री, मुंबईचे बंद सम्राट, अशी पदे भूषविणारा जॉर्ज स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून होता. साधी चप्पल त्याला पुरेशी असे. खिशात किती पैसे आहेत, याचं त्यालाही भान नसायचं.

- नंदकुमार टेणी

जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबामध्ये राजकारणाची कोणतीही परंपरा नव्हती किंवा पार्श्वभूमीही नव्हती. अत्यंत कर्मठ अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी धर्मगुरू व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु, ते राजकारणात आले आणि यशस्वी झाले. ते वृत्तीने कलंदर आणि फकीर होते. त्यांचा विवाह झाला होता तरी त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे संसार कधीच केला नाही. स्वतःचं घरकूल उभारलं नाही. त्यांनी सगळं आयुष्य कामगार संघटना आणि राजकारण यांना वाहून दिलं होतं. जॉर्जला सगळ्यात मोठा शौक होता तो लुंग्या जमवण्याचा. त्यांच्याकडे जवळपास १६०० प्रकारच्या लुंग्या त्यांनी जमवून ठेवल्या होत्या. 

पांढरा पायजमा आणि झब्बा हा वेष बाहेर आणि घरात बनियन व लुंगी हा वेष. हे त्यांच्या साधेपणाचे द्योतक होते. कितीतरी वर्षे - विशेषतः तारुण्यातले - नारळाचं पाणी हे त्यांचं जेवण होतं. दिवसभर राजकारण, संध्याकाळी युनियनच्या मीटिंग या सगळ्यात त्यांना जेवायला वेळच मिळायचा नाही. मग रात्री १२-१ वाजलेले असताना रस्त्यात जो कुणी नारळ पाणी विकणारा दिसेल तोच त्यांचा आधार असायचा. मग तो २-३-४ अशा शहाळ्यातले पाणी ते पोटभर प्यायचे आणि सुखाने झोपी जायचे. 

नेता म्हणून ते कितीही कठोर असले तरी त्यांच्यातला माणूस अत्यंत प्रेमळ होता. बाळासाहेब ठाकरे, त्यांची शिवसेना आणि जॉर्ज म्हणजे कट्टर हाडवैरी. सेना मुंबई महापालिकेत सत्तेवर किंवा सत्तेत सहभागी आणि त्याच महापालिकेत जॉर्ज यांची युनियन; त्यामुळे संघर्ष अटळ असायचा. पण व्यक्तिगत पातळीवर जॉर्ज आणि बाळासाहेब घनिष्ट मित्र होते. महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा बाळासाहेबांच्या घरी ते जायचे आणि मनसोक्त गप्पांची मैफल रंगायची आणि माँच्या हातच्या सुग्रास भोजनाचा आनंदही लुटला जायचा. बाळासाहेबच सांगायचे की आठवड्यात एकदा तरी जॉर्ज आला नाही की माँनाच त्याची आठवण यायची. त्या विचारायच्या, 'तुमचं काही बिनसलं आहे का?. कितीतरी दिवस झाले जॉर्ज तुमच्या पंक्तीला आला नाही?' मग मीच म्हणायचो, 'तो त्याच्या व्यापात असेल, विसरला असेल. मग माँच त्याला फोन करायच्या आणि म्हणायच्या मागच्या वेळी जेवलास तेव्हा भरलेलं पोट अजून भरलेलंच आहे वाटतं? आला नाहीस साहेबांसोबत गप्पा मारायला? गप्पांची मैफल सजवायला?' माँ म्हणजे बाळासाहेब आणि जॉर्ज यांचं हायकोर्ट होतं. दोघांमध्ये कटुता निर्माण झाली, भांडण झालं, वाद झाला की ते प्रकरण माँच्या हायकोर्टात जायचं आणि सुग्रास भोजन करण्याची शिक्षा दोघांनाही ठोठावून ते निकाली निघायचं. कधी कधी गप्पा मारताना वाद टोकाला पोहोचायचा, दोघांचे आवाज चढायचे. अशा वेळी अधिकारवाणीने मीनाताई त्यांना गप्प करायच्या. 

जॉर्जच्याच पक्षाचे एक नेते निहाल अहमद जॉर्जबद्दल सांगायचे, 'जॉर्ज हमारे लिए भागता भूत था. वो अभी बम्बई में, तो चार घंटे में दिल्ली में दिखेगा. ऐसा लीडर मैने आज तक देखा नाही, जिसके लिए पार्टी और युनियन सब कुछ था. समर्पित नेता कैसा हो, यह अगर दिखाना हो तो जॉर्ज के सिवा और कोई बचा ही नही है.' जेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला 'भागता भूत' ही पदवी बहाल केली, तेव्हा त्याने मोठ्या आनंदाने तिचा स्वीकार केला होता आणि तो गमतीने म्हणाला होता, 'चलो पंचमहाभूतो में यह एक नया भूत अ‍ॅड हो गया' आणि दिलखुलास हसला होता. 

ज्येष्ठ काँग्रेस नेते हुमायून कबीर यांच्या कन्येशी जॉर्जने विवाह केला. तिचं नाव होतं लैला. विवाह तरी किती वेगळ्या पद्धतीने केला. एका विमानप्रवासात योगायोगाने जॉर्ज आणि लैला शेजार-शेजारच्या सीटवर बसले होते. तिथेच प्रेम जुळलं आणि तिथेच विवाह झाला. 'हवाई शादी' म्हणून त्याची संभावना झाली. विवाह तर झाला, पण कलंदर वृत्तीचा जॉर्ज आणि जन्मापासून वैभवात लोळलेली लैला यांचा संसार कसा होईल आणि कितपत टिकेल, हा प्रश्नच होता. आणि झालंही तसंच. ज्याला समाधानी गृहस्थाश्रमी जीवन आपण म्हणतो, तसं कधी जॉर्जच्या नशिबी आलं नाही. इतका मोठा नेता असला तरी १० बाय १०च्या खोलीत राहणं आणि बंगल्याच्या बाकीच्या सगळ्या खोल्या कार्यकर्त्यांना वाटून टाकणं, हेच जॉर्जने आयुष्यभर पसंत केलं.

मधला बराच काळ जॉर्जच्या सोबत कुटुंबातलं कुणीही नव्हतं. पीए आणि पीएस किंवा जवळचे कार्यकर्ते हेच त्याचे कुटुंबीय होते. त्यानं त्याचीही कधी पर्वा केली नाही. देशाचे उद्योगमंत्री, संरक्षणमंत्री, मुंबईचे बंद सम्राट, अशी पदे भूषविणारा जॉर्ज स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून होता. म्हणजे, हातात कागद पेन घेऊन बसलं तर जॉर्जचा महिन्याचा खर्च १०-१२ हजार रुपयाच्या पलीकडे गेला नसता. लुंगीचे, पायजम्याचे आणि झब्ब्याचे आणि अंडरवेअर्सचे प्रत्येकी चार-चार जोड म्हणजे त्याचा वॉर्डरोब होता. साधी चप्पल त्याला पुरेशी असे. खिशात किती पैसे आहेत, याचं त्यालाही भान नसायचं.

त्याला प्राण्यांची खूप आवड होती. मला अजूनही त्याची पहिली भेट आठवते. नासिकला कॉम्रेड माधवराव लिमयेंच्या घरी त्यानं प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. आम्ही सगळे पत्रकार त्याची वाट बघत होतो. असं वाटलं की, एवढा मोठा तेवढा म्हणजे खूप मोठा लवाजमा असेल. परंतु, साध्या टॅक्सीतून जॉर्ज माधवरावांसोबत उतरला. तेवढ्यात माधवरावांनी पाळलेल्या पॉमेरीयन कुत्र्याने जॉर्जच्या दिशेने धाव घेतली. जॉर्जने त्याला आपल्या नातवाला उचलून घ्यावं तसं पटकन उचलून घेतलं, घट्ट मिठी मारली. बाळाला खांद्यावर घ्यावं तसं त्याला खांद्यावर घेतलं आणि तो त्याला थोपटत, कुरवाळत राहिला. आमची पूर्ण पत्रकार परिषद होईपर्यंत, एखाद्या बाळानं आईच्या कडेवर तिच्या खांद्यावर मान टाकून जसं सुखाने पडून राहावं, तसा तो श्वान त्यांच्या खांद्यावर विसावला होता. 

काही वेळानं स्नॅक्स आले, तेव्हा प्रेमाने तो म्हणाला, 'अरे बाळा, चल उठ. आपण दोघंही च्याऊ म्याऊ करू'. मग जॉर्जच्या मांडीवर बसून त्याने आपल्या हाताने भरवलेला पदार्थ तो श्वान मोठ्या आनंदाने खात होता. त्यानंतर जॉर्जची रविवार कारंज्यावर सभा होती. तिथे जाण्यासाठी टॅक्सी आली. आमचा निरोप घेऊन जॉर्ज टॅक्सीकडे जायला निघाला, तेव्हा तो श्वानही त्याच्याआधी टॅक्सीत जाऊन बसला. तेव्हा जॉर्ज गमतीने म्हणाला, 'अरे बसू दे त्याला. त्यालाही घेऊन जाऊ. आजच्या माझ्या सभेचा चीफ गेस्ट त्यालाच बनवून टाकू.'

जॉर्जचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास पाच दशके राजकारणात, सत्ताकारणात, कामगार क्षेत्रात अग्रस्थानी राहूनही जॉर्जच्या एकाही नातेवाईला किंवा कुटुंबातील सदस्याला कधी त्याने पुढे आणले किंवा तो त्याच्या अवतीभवती आहे असं झालं नाही. मुंबईचा पहिला 'बंदसम्राट' हा किताब त्याने मिळवला. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे त्याने बंद करून दाखवली. तिचा संप घडवला. परंतु, या एकाही लोकोत्तर घटनेचे त्याने भांडवल केले नाही. त्याच्या मुखातून या गोष्टींचा कधी उल्लेखही व्हायचा नाही. I have not done anything special, it was the need of our and I had became a only instrumental इतक्या सहजपणे तो त्या साऱ्या गोष्टी संपवून टाकायचा. 

जॉर्जचा भाऊ मुंबईमध्ये होता. परंतु, या भावाने आणि जॉर्जने कधीही ही गोष्ट कुणाला कळू दिली नाही. भाऊ एका मोठ्या कंपनीत अत्युच्च पदाला होता. पण ते भाऊ होते हे आजही कुणाला कळालेलं नाही. तो भावाकडे जात नसे किंवा भाऊ त्याच्याकडे जात नसे. यामागे कुठलाही विद्वेष नव्हे, तर आपापलं व्यक्तिगत आयुष्य, त्यातला खासगीपणा अबाधित राहावा हा हेतू होता. या दोघांमध्ये कुठलीही कटुता नव्हती. जॉर्जचे आत्मचरित्र लिहिण्यासाठी जेव्हा मी त्याच्या बंधूंना हुडकून काढले आणि फोन केला तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हाच होता, 'Gentleman, from where you got my number? Who told you that I am his brother? Please, do not publish my any photograph in your book. Try to keep my identity maximumly hidden. If you are agree then we will start our interaction. Otherwise have a cup of tea and get depart.'

आजचे राजकारणी, सत्ताधारी नेते, मंत्री आणि त्यांच्या सभोवतालची त्यांची कौटुंबिक भुतावळ पाहिली की असं वाटतं जॉर्जच्या नखाची सरही त्यांना येणार नाही.

'म्युझियम ऑफ स्टॅच्युज'

मुंबईमध्ये जेव्हा पुतळ्यांवरून दंगली व्हायला लागल्या, तेव्हा जॉर्जने एक अफलातून तोडगा सुचवला होता की मुंबईतील सगळे पुतळे काढून टाका, एक संग्रहालय उभं करा आणि त्यामध्ये ते सुव्यवस्थितपणे मांडून ठेवा. 'म्युझियम ऑफ स्टॅच्युज' असं नाव त्याला द्या. पुतळ्यांची देखभाल होईल, महापुरुषांचा अवमान होणार नाही आणि मुंबईतील रस्त्यात अडथळे ठरणारे हे पुतळे म्युझियममध्ये गेल्याने वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल.  

कोकण रेल्वे आणि जॉर्ज फर्नांडिस

महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबई आणि कोकणावर जॉर्जचे मोठे ऋण आहे. कारण जॉर्जमुळेच कोकण रेल्वे होऊ शकली. कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे आणि त्याचे काम एकाच वेळी तीन ठिकाणाहून सुरू करावे, ही कल्पना त्याचीच आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अध्यक्षपदी ई. श्रीधरन यांना नेमण्याची कल्पनाही जॉर्ज यांचीच. विमानामध्ये जॉर्ज आणि श्रीधरन एकत्र बसले होते. तेव्हा त्यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली आणि जॉर्ज इतके एक्साईट झाले की त्यांनी, You put a proposal in black and white and send it to me then I will take care of it असं सांगितलं. त्यानंतर, श्रीधरन यांनी संपूर्ण प्रपोजल तयार करून पाठवले आणि १५ दिवसांतच सारी सूत्रे वेगाने हलू लागली. दिल्लीतल्या एका शासकीय इमारतीत १० बाय १५ च्या खोलीत कोकण रेल्वेचे कार्यालय थाटले गेले. तेव्हा त्यात फक्त एक टेबल, तीन खुर्च्या आणि ई श्रीधरन हे अध्यक्ष एवढाच लवाजमा होता. येथून सुरू झालेला कोकण रेल्वेचा प्रवास आज किती विस्तारला आहे हे आपण सगळे जण पाहतो आहोत. 

व्हायचं होतं धर्मगुरू, पण...

जॉर्ज यांना धर्मगुरू व्हायचे होते. त्यासाठी त्यांना बंगलोरच्या सेनिनरीमध्ये पाठवले गेले. अडीच वर्षं काढल्यानंतर त्यांना तिथला भेदभाव दिसू लागला. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेगळे भोजन, दुय्यम दर्जाची आसन आणि निवास व्यवस्था, तर शिक्षक असलेल्या धर्मगुरूंचे ऐष-आरामी राहणे त्यांना खटकू लागले आणि त्यांनी तिला कायमचा राम-राम ठोकला. 

आईचा 'राजा'

जॉर्ज यांची आई ब्रिटीश राजे किंग जॉर्ज यांची अत्यंत चाहती होती. म्हणून तिने त्यांचे नाव जॉर्ज असे ठेवले होते. 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना