लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 07:03 IST2025-06-02T07:01:21+5:302025-06-02T07:03:56+5:30

१९८०च्या दशकात ‘सायकल चालवणारा मुलगा’ म्हणून मी पाहिलेले पुणे आता बदलले आहे. आपण आपल्या शहरांचे ‘पुणे’ होण्यापासून वाचवू शकतो का? 

Special Article Why is 'wealthy' Pune cursed by disorderly poverty Potholes make it difficult to even walk | लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण

लेख: ‘श्रीमंत’ पुण्याला अव्यवस्थेच्या दारिद्र्याचा शाप का? खड्ड्यांमुळे चालणेसुद्धा कठीण

अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’

गेल्या आठवड्यात पुण्यात होतो. एकेकाळी ‘वयोवृद्ध पेन्शनर्स आणि कला-संगीतप्रेमींना राहण्यासाठी सर्वोत्तम शहर’ असा पुण्याचा लौकिक होता; परंतु आता तो राहिलेला नाही. पुणे आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आणि लोभी बांधकाम व्यावसायिकांचे शहर झाले आहे. 
इतर सर्व राज्यांतून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी सतत येत असतात. शहरातल्या अनेकानेक आलिशान संस्थांवर राजकीय नेत्यांचे स्वामित्व आहे. अपवाद वगळता त्यातील अनेक ठिकाणच्या शिक्षण-दर्जाविषयी आपण केवळ अंदाज बांधू शकतो. गगनचुंबी इमारतींच्या श्रीमंत विकासकांनी या संपूर्ण शहरात खोदकाम करून ठेवले आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बांधकाम व्यावसायिकांना परवानग्या देताना अत्यंत उदार दृष्टिकोन ठेवलेला असावा. 

नकाशा व्यतिरिक्त आणखीन काही ‘रंगीत कागद’ त्यांच्यापर्यंत पोहोचत असावेत. पुण्यात भर मे महिन्यात एकही दिवशी मी कडक ऊन पाहिले नाही. मे महिना सर्वाधिक उन्हाळ्याचा; पण अखंड पाऊस सुरू असलेल्या पावसाने या शहराच्या उणिवा वेशीवर टांगल्या. एकेकाळी उत्तम नियोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराच्या मुख्य रस्त्यांवर चिखलाने भरलेल्या खड्ड्यांमुळे साधे चालणेसुद्धा अतिशय मुश्कील झाले होते. 

वेगाने आलेली आर्थिक समृद्धी, बिमारू राज्यांमधून येथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या मागोमाग जथ्याने आलेले त्यांचे पालक आणि  उद्योगजगतात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे पेशव्यांच्या या ऐतिहासिक मराठी  शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. हा बदल कोणासाठीही चांगला नाही. काही मूठभर श्रीमंतांनाच त्याचा काही फायदा झालेला दिसतो.

कधी काळी हे शहर सायकल चालवणाऱ्यांचा स्वर्ग मानले जात होते. सुंदर रस्त्यावर दोन्ही बाजूला झाडी होती. आजूबाजूला  स्वच्छ नद्या वाहत होत्या. आता सायकलींच्या जागी मर्सिडीज आणि इतर  महागड्या गाड्या आल्या आहेत. त्यामुळे पायी चालणारे आणि सायकल चालवणारे यांचे जीवन दुष्कर झाले आहे. 

गेल्यावर्षीची भयानक दुर्घटना आठवा. एका बिघडलेल्या श्रीमंत मुलाने  आपल्या मर्सिडीजखाली दोन विद्यार्थ्यांना चिरडले होते. पुण्यात होणाऱ्या दुर्घटनांवर नजर टाकली तर लक्षात येते की अनिर्बंध वेगाने धावणाऱ्या श्रीमंतांच्या महागड्या गाड्या लोकांच्या जीवावर उठल्या आहेत.

सत्ता, पैसा आणि दारूच्या नशेत या लोकांनी पोलिस आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्थेला धाब्यावर बसवले आहे. अन्य शहरांप्रमाणेच पुण्यातील नद्या नागरिकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे नाले झाल्या आहेत. ‘पुणे तेथे काय उणे’ ही जुनी उक्ती आता उपयोगाची राहिलेली नाही. परंतु आता जुने पुणेकर  बाहेर जायला असमर्थ आहेत.  प्रसिद्ध पश्चिम घाटाच्या सौंदर्याने वेढलेल्या शांत वातावरणाचे वास्तव झाकोळत जात असताना ते या शहरात अडकून पडले आहेत.

शहरीकरणाचा भेलकांडवणारा वेग आणि भविष्यावर नजर ठेवून दूरदर्शी योजना आखण्यात सरकारी व्यवस्थेला आलेल्या अपयशामुळे पुण्याची ही अवस्था झाली आहे. ज्या शहराने स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक, प्रतिष्ठित गायक भीमसेन जोशी, उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर यांच्यापासून खगोल-भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासारखे असामान्य नागरिक दिले, ते शहर आधुनिकतेच्या मागे जाण्याच्या नादात आपले वैशिष्ट्य गमावून बसले आहे. असहाय्य पुणेकर हळहळण्याशिवाय काही करू शकत नाही, अशी अवस्था आहे.

१९८०च्या दशकात एक सायकल चालवणारा मुलगा म्हणून मी पाहिलेले पुणे हिरवेगार, सुंदर आणि शांत होते. ते आता तसे राहिलेले नाही. आपण आपल्या शहरांचे  ‘पुणे’  होण्यापासून त्यांना वाचवू शकतो का? कदाचित नाही... आणि तेच आपले दुर्दैव असेल.

Web Title: Special Article Why is 'wealthy' Pune cursed by disorderly poverty Potholes make it difficult to even walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे