Kantabai Satarkar: ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:39 AM2021-05-29T05:39:56+5:302021-05-29T05:46:56+5:30

Kantabai Satarkar: घर सोडून पायात चाळ बांधलेली ही हिकमती मुलगी पुढे तमाशाचे फड गाजवणारी सरदारीण बनली : कांताबाई सातारकर!

‘Pay attention, Sakhya, I am your Kanta’ | Kantabai Satarkar: ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’

Kantabai Satarkar: ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’

Next

- सुधीर लंके 
(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)

‘गावची हागणदारी ही आम्हा तमासगिरांची वतनदारी आहे’ असं तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर महाराष्ट्र शासनाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या होत्या. त्यांच्या या बोलण्यात एक दु:खाची सल होतीच, पण व्यवस्थेने आम्हा तमाशा कलावंतांची कितीही अवहेलना केली तरी आम्ही समाजासाठीच लढतो व जगतो,’ हेही त्यांना यातून ध्वनित करावयाचे होते. नुकतेच वयाच्या ८२ व्या वर्षी या सम्राज्ञीचे निधन झाले. त्यांचे पती तुकाराम खेडकर हे १९६४ साली निवर्तले. आज कोरोना महामारीने कांताबाईंना हिरावल्याने एक प्रकारे तमाशातील ‘राजाराणी’ हरपल्याची या जगतातील भावना आहे.

त्या एकही इयत्ता शिकलेल्या नव्हत्या. पण, तमाशाच्या इतिहासात नोंद करणारी भूमिका त्या जगल्या. मूळच्या सातारच्या. कांता साहेबराव कांबळे. त्यांच्या गावावरून त्यांना नवे आडनाव मिळाले. पण, अलीकडे चाळीस वर्षे त्या नगर जिल्ह्यात संगमनेर येथे स्थिरावल्या होत्या. आई-वडील दगडखाणीत काम करायचे. कुटुंब जगविण्यासाठी कांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षी साताऱ्याला अहिरवाडीकरांच्या तमाशाद्वारे पायात चाळ बांधले. घरच्यांशी द्रोह पत्करत या एकट्या मुलीने पुणे, मुंबई गाठली व स्वत:चे जीवन घडविले. दादू इंदोरीकरांच्या तमाशात त्यांना प्रवेश मिळाला होता. मात्र, त्यापेक्षा तुकाराम खेडकर यांचा तमाशा आवडल्याने त्यांनी त्या तमाशात काम केले. भालजी पेंढारकर यांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी तमाशाच पसंत केला.

तुकाराम खेडकर हेही महाराष्ट्रातील मोठे फडमालक. कलाकार म्हणूनही दादा माणूस. ते मूळचे कोकणातील. त्यांचे कुटुंब मुंबईत प्लेगच्या साथीने गेले. पुढे जगण्यासाठी ते तमाशात कामाला लागले व या लोकांच्या मनावर गारुड करत तमाशासम्राट, वगसम्राट बनले. रंगमंचावर ‘रायगडची राणी’, ‘हरिश्चंद्र तारामती’ अशा वगनाट्यांत तुकाराम खेडकर व कांताबाई हे राजाराणीच्या भूमिका साकारायचे. आयुष्यातही एकमेकांचे सोबती बनलेल्या या जोडीने तमाशा रसिकांना वेड लावले. पतीचे छत्र हरपल्यानंतर त्यांची फरफट झाली. पतीच्या साथीदारांनी त्यांना मदत केली नाही, म्हणून पतीच्या नावाने असलेला फड सोडत त्यांनी स्वत:च्या व मुलगा रघुवीर यांच्या नावाने स्वतंत्र फड उभारला. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी वैयक्तिक पातळीवर या फडाला आर्थिक मदत करत राजधर्म जपला होता.

कांताबाई या एका अर्थाने तमाशातील विक्रमवीर ठरतात. त्या तमाशातील पहिल्या ‘स्त्री सरदार’ म्हटल्या जातात. ‘सरदार’ म्हणजे तमाशात मालक, व्यवस्थापक, कलाकार, शाहीर अशा सगळ्या भूमिका निभावणे. तमाशात पुरुष हे स्त्री भूमिका साकारतात. परंतु कांताबाईंनी पुरुषांच्या भूमिका साकारण्याचे धाडस केले. खानदेशात संगीतबारी प्रसिद्ध आहे. पण, तेथे ढोलकीचा तमाशा कांताबाईंनी लोकप्रिय केला.

एका स्त्रीने तमाशात पुरुषी भूमिका साकारणे काही फड मालकांना पटत नव्हते. मात्र, कांताबाई ही बंडखोरी बिनधास्त करत आल्या. तुकाराम खेडकर हे राष्ट्र सेवा दलाला मानणारे होते. बॅरिस्टर नाथ पैंसारख्या नेत्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचायला हवेत, यासाठी तुकाराम खेडकर त्यांना तमाशात बोलावत. कार्यक्रम मध्येच थांबवत व भाषण करायला लावत. हाच कित्ता कांताबाई व त्यांचा मुलगा रघुवीर यांनी गिरविला. तमाशाच्या कार्यक्रमातून त्यांनी अनेक शाळा व आजारी व्यक्तींना शस्त्रक्रियेसाठी मदत केली. 

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे राज्य शासनाने तमाशा कलावंतांसाठी ‘जीवनगौरव’ पुरस्कार सुरू केला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा पहिला पुरस्कार कांताबाईंना मिळाला. दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तमाशा सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला. तमाशा जगला पाहिजे व या कलावंतांना सन्मान मिळायला हवा, ही धडपड त्यांनी सतत केली. ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’ या लावणीवरून कांताबाईंचे नामकरण झाले. पण, ही कांता तमाशाची सरदार बनली.

Web Title: ‘Pay attention, Sakhya, I am your Kanta’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.