युद्ध कुणीही जिंको, मरतो सामान्य माणूसच!
By विजय दर्डा | Updated: March 16, 2026 07:00 IST2026-03-16T06:58:48+5:302026-03-16T07:00:29+5:30
ना हार, ना जीत; युद्ध केवळ जखमा देते; परंतु बादशाहीची भूक मिरवत फिरणाऱ्या बेलगाम माथेफिरूंना ही गोष्ट कोण, कशी, कधी समजावणार?

युद्ध कुणीही जिंको, मरतो सामान्य माणूसच!
डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
युद्धाच्या बाबतीत एक अतिशय जुनी म्हण आहे, ‘युद्ध कोणीही जिंकू द्या, वास्तवात सामान्य माणूसच मरतो. अमेरिकी क्षेपणास्त्रांनी इराणमध्ये ज्या खामेनेईंना मारले, त्याच क्षेपणास्त्रांनी निरपराध मुलांचाही बळी घेतला. इराणने आपल्या शेजारच्या देशांवर ड्रोन हल्ले केले. त्यात मरणारे, जखमी होणारे बहुतेक लोक निरापराधच होते. जहाजावर काम करणाऱ्यांनी काय गुन्हा केला होता की त्यांना लक्ष्य केले जावे? युद्धाचा एकच हेतू असतो दहशत, विध्वंस आणि हत्या करणं.
तुम्ही-आम्ही किंवा आपला भारत देश युद्धाचा भाग नाही. परंतु, आपणही त्यात होरपळून निघत आहोत. हजारो भारतीय कुठे जहाजात, तर कुठे एखाद्या देशामध्ये अडकून पडले आहेत. आखाती देशात कोट्यवधी भारतीय राहतात, त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. भारतात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण झाली. तथापि त्याचेही राजकारण चालू आहे. मला वाटतं, सरकारनं परिस्थिती स्पष्ट करावी आणि जनतेकडून सहकार्य घ्यावं. रस्त्याच्या कडेला असलेले ढाबे जे सामान्य माणसाचं पोट भरतात, त्यांच्यासाठी गॅसचा पुरवठा सुनिश्चित करावा.
१९७९ मध्ये इस्लामिक क्रांती होऊन अमेरिकेच्या पसंतीचे शाह रजा पहलवी (शाह ऑफ इराण) यांची राजवट उलथवली गेली आणि अयातुल्ला खोमेनी शासक झाले. त्यांनी इराणवासीयांचे मानवाधिकार आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं. शाहच्या काळातील वैज्ञानिक, संरक्षण दलातील अधिकारी आणि इतर प्रमुख लोकांना ठार केलं गेलं, तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पुढच्याच वर्षी अमेरिकेने इराकचे शासक सद्दाम हुसेन यांच्या पाठीवर हात ठेवला आणि सद्दाम यांनी इराणवर हल्ला केला. अमेरिकेने इराकला शस्त्रे दिली. पैसे पुरवले. आठ वर्षे हे युद्ध चालले; परंतु इराक इराणला हरवू शकला नाही. का? - कारण इस्रायल इराणच्या मागे होता. आणि इस्रायलच्या मागे?- अमेरिकाच होती. अमेरिकेने असे का केले? इराणबरोबरच इराकलाही कमजोर करणे हाच अमेरिकेचा हेतू होता. त्या युद्धात लाखो लोक मारले गेले. त्यात रासायनिक शस्त्रांचाही वापर झाल्याचा आरोप आहे. ज्या सद्दामला अमेरिकेने आपला मोहरा केले त्यालाही मृत्युदंड देण्यात आला. त्याने रासायनिक शस्त्रे तयार केली होती असा त्याच्यावर आरोप होता. प्रत्यक्षात मात्र इराककडे कणभरही रासायनिक शस्त्रे मिळाले नाहीत. इराकचे नागरिक मात्र उद्ध्वस्त झाले.
आता इराणविषयी बोलू. तेथे महाबॉम्ब टाकल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःच सांगितले की, इराणची परमाणुक्षमता नष्ट केली गेली आहे. मग बोलणी झाली. परंतु, इराणने आपल्याजवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे ठेवू नयेत अशी अमेरिकेची इच्छा होती. कोणताही देश आपल्या सार्वभौमत्वाशी अशाप्रकारे तडजोड कशी करेल? - इराणने नकार दिला. त्यानंतर अमेरिका हल्ला करणार हे निश्चित झाले; परंतु इराण आपल्या आसपासच्या आखाती देशांतील अमेरिकेच्या सैन्यतळांवर हल्ला करून संपूर्ण प्रदेश युद्धाच्या खाईत लोटेल, याचा अंदाज अमेरिकेला हल्ला करण्यापूर्वी आला नाही. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हल्ले झाले. दुबई निर्विवादपणे जगाचं आर्थिक केंद्र बनलेलं आहे. जगभरातून धन-दौलत इथे येते. त्याच दुबईवर झालेल्या हल्ल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर संकट निर्माण केलं आहे. हाही काही डाव आहे का?
आता काही झाले तरी हे युद्ध लवकरात लवकर थांबले पाहिजे असे दडपण संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, कुवेत, बहरीन, कतार आणि जॉर्डनसारखे देश अमेरिकेवर टाकत आहेत. परंतु, ट्रम्प त्यांचे ऐकतील? इराणच्या आक्रमक पवित्र्याने सर्वांमध्ये भयंकर भीती उत्पन्न केली आहे. इराणला त्याचा फायदाही मिळतो आहे. प्रश्न हादेखील आहे की अमेरिकेला याचा अंदाज होता का, की खामेनेई आणि केवळ इराणी नेत्यांच्या मृत्यूनंतरही इराण अशा प्रकारचा हल्ला करेल? सांगणं कठीण आहे, पण इराणच्या मागे चीन आणि रशिया उभा आहे यात शंका नाही. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम वास्तवात चीनच्या मदतीवर चालतो. अशा स्थितीत चीनच्या ताकदीवर गुरगुरण्यात इराण मागे का राहील? अमेरिकेच्या हल्ल्यानंतर चीन शस्त्र हाती घेऊन इराणच्या मदतीला आलेला नाही; परंतु इराणला त्याची उघड मदत चालली आहे. चीनच्या सहकार्याने तयार झालेली इराणची स्वस्त क्षेपणास्त्रे निकामी करण्यासाठी अमेरिकेला आपली महागडी शस्त्रे वापरावी लागत आहेत. अमेरिकेचे आर्थिक नुकसान करणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेच्या तळांवर इराणने केलेल्या हल्ल्यांची उपग्रह छायाचित्रे चीननेच जगाला दाखवली. जेणेकरून अमेरिकेची नाचक्की होईल.
चीन प्रत्यक्षात अमेरिकेची गंमत पाहत आहे. इकडे रशियाने तर तिसऱ्या विश्वयुद्धाचा धोका आधीच वर्तवला आहे. आता प्रश्न असा की या युद्धात पुढे काय होईल? इराणमधील राजवट बदलण्याचा अमेरिकेचा हेतू साध्य होईल? अमेरिका हवाई युद्धात पारंगत आहे. परंतु हवाई हल्ल्यांनी राजवट बदलत नाही असे इतिहास सांगतो. अमेरिकेचे सैन्य खूपच शक्तिमान आहे; परंतु अवघड भौगोलिक रचना हे बलस्थान असलेला इराण काही दशके लढत राहील. खामेनेईंच्या मृत्यूनंतरही इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डची दहशत इतकी आहे, की लोकशाहीसाठी बंडाचा मार्ग सोपा नाही.. इराणचे लोक अजूनही उद्ध्वस्त स्थितीत आहेत. खाली खामेनेईंचे चेले गळा दाबत आहेत, तर वरून अमेरिकेची क्षेपणास्त्रे प्राण घेत आहेत. सामान्य माणसाने करावे तरी काय?